महिला आरक्षणासाठी मतदारसंघ पुनर्रचना आवश्यक-डॉ.हुलगेश चलवादी
पुणे, 20 एप्रिल (हिं.स.)। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या संदर्भात मांडलेली भूमिका ही सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अस
महिला आरक्षणासाठी मतदारसंघ पुनर्रचना आवश्यक-डॉ.हुलगेश चलवादी


पुणे, 20 एप्रिल (हिं.स.)। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या संदर्भात मांडलेली भूमिका ही सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन 'आरपीआय'चे (आ) प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी केले आहे.

महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आणलेले १३१ वे घटनादुरुस्ती विधेयकाला विरोधकांनी विरोध करीत लोकसभेत पारित होऊ दिले नाही. विरोधी पक्षांकडून मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेला विरोध केला जात आहे, मात्र हा विरोध महिलांच्या सक्षमीकरणाच्या मार्गात अडथळा ठरणारा आहे. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतरच जागांची संख्या वाढेल आणि त्यातूनच महिलांना आरक्षणाची संधी मिळेल, अशा शब्दात डॉ.चलवादी यांनी ना.आठवले साहेब आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “सीमांकन विधेयकाला पारित होऊ न देणे म्हणजे प्रत्यक्षात महिलांच्या हक्कांना विरोध करण्यासारखे आहे. सूचना देण्याचा अधिकार प्रत्येकाला असला, तरी विकासात्मक आणि समावेशक धोरणांना पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे, असे मत आठवले साहेबांचे असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

महिला आरक्षण विधेयक हे केवळ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणलेले नव्हते, देशातील महिलांना राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याचा एक व्यापक आणि दीर्घकालीन प्रयत्न होता. त्यामुळे या प्रक्रियेला विरोध करण्याऐवजी सर्व घटकांनी सकारात्मक भूमिका घेणे अपेक्षित होते, असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिलांच्या सन्मान आणि हक्कांसाठी कटिबद्ध असून, विरोधकांकडून होणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांचा निषेध करते,” असे नमूद करीत डॉ.चलवादी यांनी देशभरात महिलांच्या अधिकारांसाठी जनजागृती आणि आवश्यक ते आंदोलन उभारण्याचा ना.आठवले साहेबांच्या निर्धाराचे समर्थन केले. ---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande