
- 136 जणांची प्राथमिक तर 90 उमेदवारांची अंतिम निवड
परभणी, 31 जुलै (हिं.स.) - जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी, श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर वरिष्ठ महाविद्यालय, जिंतूर तथा श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित), नाशिक शाखा, जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 31 जुलै) रोजी श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर वरिष्ठ महाविद्यालय, जिंतूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.
मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या युवक-युवतींची उपस्थिती होती. बँक अधिकारी, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, क्षेत्र अधिकारी (एसएफओ/आरओ), नर्सिंग, वॉर्डबॉय, रिसेप्शनिस्ट, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, कृषी अधिकारी, ट्रेनी ऑपरेटर, विमा सल्लागार, विमा सखी, लाईफ मित्र, कार्यालयीन कर्मचारी आदी विविध पदांसाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात आली.रोजगार मेळाव्यास एकूण 170 उमेदवार उपस्थित होते. त्यामध्ये 136 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून 90 उमेदवारांची अंतिम निवड झाली. त्यामुळे अनेक होतकरू युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खंडेराव भिसे होते. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. मिटकुळे यांनी स्वबळावर रोजगाराच्या संधी कशा निर्माण कराव्यात, याबाबत उमेदवारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी समाधान किरवले यांनी केले.रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या उपक्रमामुळे परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis