
बीड, 31 ऑगस्ट (हिं.स.) : अहिल्यानगर-बीड-परळी लोहमार्गासाठी तब्बल ४५ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रतीक्षेला आता हळूहळू वेग येताना दिसत आहे. अनेक आंदोलने, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या मार्गावरील रेल्वेसेवेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने अहिल्यानगर-बीड डेमूच्या वेगात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकामुळे अहिल्यानगर ते बीड आणि बीड ते अहिल्यानगर प्रवास अधिक जलद होणार आहे.
सध्या अहिल्यानगरहून बीडकडे येण्यासाठी डेमू रेल्वेला सुमारे साडेपाच तास लागत होते. मात्र, नव्या वेळापत्रकानुसार हा प्रवास सुमारे चार तासांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे दररोज रेल्वेने प्रवास करणारे विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी आणि नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.गाडी क्रमांक ७१४४१ अहिल्यानगर-बीड डेमू १ सप्टेंबरपासून अहिल्यानगर स्थानकावरून सकाळी ६.५५ वाजता सुटण्याऐवजी सकाळी ७.४५ वाजता सुटेल. म्हणजेच गाडी ५० मिनिटे उशिराने सुटणार असली, तरी वेग वाढल्यामुळे ती बीड स्थानकावर पूर्वीच्या दुपारी १२.३० वाजताच्या वेळेऐवजी सकाळी ११.४५ वाजता पोहोचणार आहे.परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ७१४४२ बीड-अहिल्यानगर डेमू बीड स्थानकावरून दुपारी १ वाजण्याऐवजी दुपारी १२ वाजता सुटणार आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis