
अमरावती, 20 सप्टेंबर (हिं.स.)। जुने शहर, बारीपुरा येथील जयहिंद गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वकलेने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. यंदा तब्बल ३१ किलो अंजीर आणि मखाणा या पदार्थांचा वापर करून ‘श्रीं’ची आकर्षक मूर्ती साकारण्यात आली आहे. मंडळाच्या या अनोख्या गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची दररोज गर्दी होत आहे. मागील वर्षी ७५ किलो खारीक, या पूजेच्या पदार्थापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्यात आली होती.
यंदा अंजीर आणि मखाणा या पदार्थांचा कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. मूर्ती साकारण्यासाठी तब्बल ३१ किलो अंजीर वापरण्यात आले असून, मखाण्यांचा वापर गणरायाच्या धोतीच्या सजावटीसाठी करण्यात आला आहे. आकर्षक आरास आणि वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या पर्यावरणपूरक मूर्तीची संकल्पना मंडळाचे प्रज्ज्वल पोकळे, मयूर अंबाडकर, ऋतिक अंबाडकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची आहे. जयहिंद गणेशोत्सव मंडळाचे हे ३८ वे वर्ष आहे. यंदा अध्यक्षपदी संकेत दारोकर, उपाध्यक्ष नीकेश निचत, सचिव प्रज्ज्वल पोकळे व कोषाध्यक्षपदी मयूर अंबाडकर यांची निवड करण्यात आली आहे.
मागील वर्षी ७५ किलो खारीक वापरून साकारलेली गणेशमूर्तीही विशेष आकर्षण ठरली होती. मंडळाच्या सदस्यांमध्ये शैलेश अंबाडकर, प्रतीक दाभाडे, गौरव अंबाडकर, प्रतीक दुधे, वैभव अंबाडकर, गौरव दातीर, श्रेयस पोकळे, अतुल पोकळे, आकाश पोकळे, प्रतीक अंबाडकर, यश पोकळे, सर्वेश निचत आदींचा समावेश आहे.
मंडळात नवनवे प्रयोग
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीही कापूस, भांडी, मडकी, टोपल्या, चमकी, डिस्को मणी, ५१ किलो लाल सुपारी, विविध सुकामेवा व उपवासाचे पदार्थ, मोती, नऊ प्रकारच्या तब्बल पाच हजार चॉकलेट, २१ हजार पवित्र रुद्राक्ष तसेच ५१ किलो समुद्री शिंपल्यांचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी