रत्नागिरी : दिव्यांगत्वावर मात करत गरुडाच्या वेशात गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग
रत्नागिरी, 20 सप्टेंबर (हिं.स.) । दिव्यांगत्व आले म्हणून जीवन थांबत नाही, तर जिद्द, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर प्रत्येक परिस्थितीवर मात करता येते, हे ५६ वर्षीय मारुती गणपत ढेपसे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. दोन्ही पायांची
गरुडाच्या देशात मारुती ढेपसे


रत्नागिरी, 20 सप्टेंबर (हिं.स.) । दिव्यांगत्व आले म्हणून जीवन थांबत नाही, तर जिद्द, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर प्रत्येक परिस्थितीवर मात करता येते, हे ५६ वर्षीय मारुती गणपत ढेपसे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. दोन्ही पायांची ताकद गमावल्यानंतरही त्यांनी हार न मानता पुन्हा आपल्या व्यवसायाशी नाते जोडले. गणपती विसर्जन मिरवणुकीत काल, दि. १९ सप्टेंबर रोजी त्यांनी गरुडाची वेशभूषा करून इलेक्ट्रिक तीनचाकीवरून उत्साहात सहभाग घेतला. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या सहभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मारुती ढेपसे हे नेवरे, ता. जि. रत्नागिरी येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांचे आई-वडील शेतीचे काम करीत होते. दहावीनंतर त्यांनी कोतवडे येथे स्वतःचे टू-व्हीलर रिपेअरिंग गॅरेज सुरू केले. कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी व्यवसाय उभा केला आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यास सुरुवात केली. सन १९९८ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगी असून ती विवाहित आहे, तर मुलगा शुभम ढेपसे सध्या गॅरेजचा व्यवसाय सांभाळत आहे.

गॅरेजमध्ये काम करत असताना जड वस्तू उचलल्यामुळे त्यांच्या उजव्या पायात कमजोरी जाणवू लागली. सन २००४ पासून हळूहळू पायातील ताकद कमी होत गेली. अखेर सन २०१२ मध्ये लघवी करत असताना अचानक दोन्ही पायांतील पूर्ण ताकद गेली आणि पाय लुळे पडले. कमरेपासून खालच्या भागातील संवेदना कमी झाल्या. तसेच लघवी व शौचावरील नियंत्रणही गेले. चालता येणे पूर्णपणे बंद झाल्याने त्यांना बेडवरच राहावे लागले आणि दैनंदिन जीवनातील प्रत्येक कामासाठी पत्नीवर अवलंबून राहावे लागत होते.

मिरज येथे फिजिओथेरपीसाठी उपचार घेतले; मात्र अपेक्षित सुधारणा झाली नाही. सन २०१५ मध्ये आर एच पी फाउंडेशन, रत्नागिरीचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर फाउंडेशनतर्फे त्यांना व्हीलचेअर देण्यात आली. तसेच मुंबई येथील हाजी अली हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.त्यानंतर पत्नीला सोबत घेऊन मारुती ढेपसे सुमारे पाच महिने मुंबईतील हाजी अली येथे उपचारासाठी राहिले. तेथे हॉस्पिटलकडूनही त्यांना व्हीलचेअर मिळाली. व्हीलचेअरच्या साहाय्याने ते बाहेर पडू लागले, इतरांशी संवाद साधू लागले आणि त्यांच्या मानसिक स्थितीतही सकारात्मक बदल झाला.

हाजी अली येथे उपचार घेत असताना त्यांनी बेडवरून व्हीलचेअरवर, व्हीलचेअरवरून कमोडवर स्वतः शिफ्ट होणे, स्वतः अंघोळ करणे तसेच दैनंदिन कामे स्वतः करण्याचे कौशल्य आत्मसात केले. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वावलंबनाचा आत्मविश्वास निर्माण झाला. या काळात त्यांना बेडसोरची समस्याही निर्माण झाली. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पाच महिन्यांच्या उपचारानंतर ते पुन्हा घरी परतले.

घरी आल्यानंतर हळूहळू व्हीलचेअरच्या साहाय्याने ते गॅरेजमध्ये जाऊन बसू लागले. मुलगा शुभम गॅरेजचा व्यवसाय पाहू लागला, तर मारुती त्याच्या कामावर लक्ष ठेवू लागले. परिस्थितीशी जुळवून घेत त्यांनी पुन्हा आपल्या व्यवसायाशी नाते जोडले.

या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही मारुती ढेपसे यांनी सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला. यंदाच्या गणपती उत्सवात त्यांनी गरुडाची वेशभूषा करून आपल्या इलेक्ट्रिक तीनचाकीवरून गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यांच्या या कल्पक आणि उत्साही सहभागामुळे मिरवणुकीत वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. दिव्यांगत्वाचा बाऊ न करता त्यातून इतरांना प्रेरणा देण्याचा त्यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला. पारंपरिक गणपती उत्सवात त्यांनी आपल्या सहभागातून एक वेगळेच वलय निर्माण केले. अडचणी कितीही असल्या तरी मनात जिद्द आणि जगण्याची उमेद असेल, तर जीवनातील आनंदाचे क्षण स्वतःच्या पद्धतीने अनुभवता येतात, हा संदेश त्यांच्या कृतीतून मिळतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande