रत्नागिरी, 13 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या एकूण ५६ जागांसाठी आरक्षण प्रक्रिया आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षणानुसार २८ गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) २७ टक्के आरक्षणानुसार २५ जागा राखीव ठरविण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीचा प्रारंभ लहान मुलगा श्रेयांश कुरणे याच्या हस्ते करण्यात आला. या सोडतीच्या वेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि अप्पर तहसीलदार सचिन गोसावी उपस्थित होते. संपूर्ण आरक्षण सोडत संगणकीय पद्धतीने आणि पूर्ण पारदर्शकतेने करण्यात आली. जिल्हाधिकारी जिंदल यांनी सांगितले की, ही प्रक्रिया नियमबद्ध, सर्वसमावेशक आणि पारदर्शक ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. या आरक्षण प्रक्रियेमुळे विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार असून महिलांना मिळालेल्या २८ जागांमुळे महिला नेतृत्वाच्या वाढीसाठी हे पाऊल ऐतिहासिक ठरणार आहे. सोडतीनंतर जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, सर्वसाधारण प्रवर्गात केळशी, कोतवडे, उमरोली, खालगाव, जालगाव, बाणकोट, कोळबांद्रे, भिंगळोली, कोसुंब, कडवई, गोळप, धामापूर-तर्फे संगमेश्वर, वडदहसोळ, धोपेश्वर, दयाळ, कोकरे, असगोली, दाभोळे, गवाणे आणि पावस या गटांचा समावेश आहे. सर्वसाधरण महिला प्रवर्गासाठी कळवंडे, मेढे, धामणदेवी, साटवली, खेडशी, आसगे, वहाळ, खेर्डी, कसबा संगमेश्वर, भांबेड, मुचरी, साखरीनाटे, कातळी, सातवली, सावर्डे, झाडगाव (रत्नागिरी पालिकेबाहेर) आणि वेळणेश्वर या गटांचा समावेश आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) मतदारसंघांमध्ये जुवाठी, कर्ला, पठवे, भडगाव, शृंगारतळी, सुकिवली आणि नाचणे यांचा समावेश आहे. अओबीसी महिला प्रवर्गात लोटे, कोंडकारूळ, भरणे, दाभोळ, शिरगाव, अलोरे, वीराची वाडी आणि पालगड या गटांचा समावेश आहे. अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी हातखंबा, अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी वाटद आणि अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी हर्णै या गटांची निवड झाली आहे. सोडतीला नागरिक, जनप्रतिनिधी आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी