पुणे, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
आज जग वेगाने बदलत असून प्रत्येक क्षणाला नवा विचार, नवी व्यवस्था, नवे तंत्रज्ञान समोर येत असताना अशा अनिश्चित जगात आपले कौशल्य आपल्या मदतीला येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी मिळून कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी केंद्र सरकारसोबत महाराष्ट्र राज्य शासन देखील कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या सुविधा उभ्या करीत आहे आणि त्यांना प्रोत्साहनही देण्यात येत आहे. सिम्बायोसिस विद्यापीठदेखील या दिशेने काम करत असून नोकरी मिळविण्यासाठी नाही तर नोकरी देण्याची क्षमता निर्माण करणारे शिक्षण येथे देण्यात येत आहे, असे गौरवोद्गार देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काढले.
सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहाव्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकातदादा पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले.जनरल धीरज सेठ, विद्यापीठाचे कुलपती डॉ.शां.ब. मुजुमदार, प्र-कुलगुरु डॉ. स्वाती मुजुमदार, श्रीमती संजीवनी मुजुमदार, सिंम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलगुरू डॉ.विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.
कौशल्य शिक्षण देशाच्या उभारणीसाठी महत्त्वाचे असून कौशल्यप्राप्त व्यक्ती निर्मितीसाठी योगदान देतो. निर्मितीच माणसाचे महत्त्वाचे लक्षण असून निर्मितीत व्यस्त व्यक्तीच समाजाला दिशा देऊ शकते, असे नमूद करून संरक्षण मंत्री श्री.सिंह म्हणाले, आजच्या युगात केवळ ज्ञान उपयुक्त नसून त्याचे उपयोजन करण्याची कला अवगत असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिकलेल्या बाबींना जीवनात कसे आणावे हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हेच आजच्या शिक्षणाचे उद्दीष्ट असायला हवे.
नवभारताकडे देश जात असताना स्कील इंडीया, स्टार्ट अप इंडिया आणि मेक इन इंडियावर भर देण्यात येत आहे. केंद्र सरकारने कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे. या मंत्रालयाने या क्षेत्रातील आव्हानांना संधीत रुपांतरीत करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत १ कोटी ६३ लाख उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. जनशिक्षा संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी आणि दुर्लक्षित घटकातील ३० लाखापेक्षा अधिक उमेदवारांना शिलाई, भरतकाम, हस्तकला, फळ प्रक्रिया आणि आरोग्य सेवा सहायकाचे प्रशिक्षण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील पारंपरिक कारागिरांना सक्षम करण्यात येत असून २२ लाख कारागिरांना व्यवसायाची आधुनिक साधने प्रदान करण्यात आली आहेत. यामुळे देशात कौशल्य विकासाला अनुकुल वातावरण तयार झाले आहे.
देशातील युवकाकडे कौशल्य असेल तर जगातील कोणतीच शक्ती आपल्याला रोखू शकत नाही. देशात कौशल्य विकास क्षेत्रातील प्रगती लक्षात घेता आजची पिढी कौशल्य प्राप्त करून पुढच्या युगातील तंत्रज्ञानाची पिढी घडवेल असा विश्वास वाटतो. मात्र कौशल्यासोबत संवेदनशील राहून समाजासाठी त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे, असे श्री.सिंग म्हणाले.
स्नातकांना दीक्षांत संदेश देतांना ते म्हणाले, पदवी प्राप्त करून विद्यापीठाच्या बाहेर पडणाऱ्या स्नातकांसाठी संपूर्ण विश्व आता एक नव्या विद्यापीठाप्रमाणे असेल. या स्नातकांनी भविष्यातील चिंता न करता व्यापक दृष्टीकोन बाळगावा. संकुचित विचारांनी जीवनात सुख आणि आनंद मिळविता येत नाही. स्नातकांचे यश हे समाजाचा सहयोग, संस्कार आणि पाठिंब्याचा परिणाम आहे. त्यामुळे या सर्वांविषयी कृतज्ञता बाळगणे गरजेचे आहे. कुशल बुद्धीच्या आधारे सतत कार्यरत राहून कौशल्य, संकल्प आणि परिश्रमाने स्नातक नव्या युगाची पायाभरणी करतील, असा विश्वास श्री.सिंग यांनी व्यक्त केली.
ऑपरेशन सिंदूर हे देशाच्या आत्मनिर्भरतेचे प्रतिक होते. देशाच्या लष्कराने भारतात तयार झालेल्या शस्त्रास्त्रांचा उपयोग करीत धैर्य आणि संयमाने पराक्रम गाजविला. संरक्षण साहित्य निर्मितीमध्ये भारतीय युवांनी मोठा पुढाकार घेतला असून गेल्या १० वर्षात आपली संरक्षण साहित्य निर्मिती ४६ हजार कोटी रुपयांवरून १ लाख ५० हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे. यातही सुमारे ३३ हजार कोटी रुपयांचे खासगी क्षेत्राचे योगदान आहे. २०२९ पर्यंत आपली उत्पादनक्षमता ३ लाख कोटींपर्यंत नेण्याचे आणि संरक्षण साहित्य निर्यात ५० लाख कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.
भारताने नेहमीच ‘वसुधैव कुटुंबकम्’असा संदेश आपल्या कृतीतून दिला. देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करीत असताना सिम्बायोसिससारख्या संस्थांमध्ये सुरू करण्यात आलेल्या संरक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम शिक्षणासोबत देश उभारणीचा संकल्प आहे. नव्या युगातील संरक्षण उपकरण इथले स्नातक तयार करतील, असेही संरक्षण मंत्री श्री.सिंह म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु