अहिल्यानगर, १७ ऑक्टोबर (हिं.स.) : राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नगर शहराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी देखील होते. आज सकाळी अचानकपणे छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते.
कर्डिले यांचा मूळ व्यवसाय दूध व्यवसाय असला, तरी समाजातील कार्यामुळे त्यांनी लवकरच राजकारणात स्थान निर्माण केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा पक्षातून त्यांचा राजकीय प्रवास झाला. कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2014 ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. 2014 च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती.
लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील - आ. रोहित पवार
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना! आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत! भावपूर्व श्रद्धांजली, असे त्यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी