पुणे, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।
पावसाळ्यात खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा बोजा थेट महापालिकेवर टाकण्यात आल्याचा आरोप सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. महापालिका आयुक्तांनी राज्य शासनाच्या दबावापुढे मान झुकवून परवानगी दिल्यामुळे, आधीच खड्ड्यांनी विदीर्ण झालेल्या शहरातील रस्त्यांच्या डागडुजीची जबाबदारी महापालिकेच्या रस्ते विभागावर टाकण्यात आली आहे. या सर्व कामांसाठी जवळपास 300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, आता या निधीची जबाबदारी पुण्यातील दोन मंत्री आणि आमदार उचलतील का?, असा सवाल देखील वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.
शहरातील सुमारे 300 किलोमीटर रस्त्यांवर सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी पुणे पोलिसांनी एका कंत्राटदारामार्फत काम सुरू केले आहे. पावसाळ्यात खोदाईला परवानगी न देण्याचा महापालिकेचा नियम असतानाही, गृह विभागाच्या आदेशामुळे महापालिकेला मान टाकावी लागली. या खोदाईमुळे महापालिकेला मिळणारे प्रति रनिंग मीटर 11 हजार रुपयांचे शुल्कही हुकणार आहे. शिवाय, रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी शासनाने नेमलेल्या कंत्राटदाराची नसल्याने संपूर्ण खर्च महापालिकेवरच पडणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु