परभणी, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।जिंतूर तालुक्यातील वझर बु. शिवारातील असोला पाटीजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुर्मिळ काळवीटाचा मृत्यूझाल्याची घटना सुमारास घडली.
दुर्मिळ वन्यप्राणी म्हणून ओळख असलेल्या काळवीटाचा मृतदेह रस्त्याच्या मध्यभागी पडलेला असल्याचे दृश्य पाहून नागरिकांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली. मात्र, संबंधित विभागातील वनाधिकारी विठ्ठल बुचाले यांनी ही घटना त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील असल्याचे सांगत जबाबदारी टाळली. त्यानंतर नागरिकांनी वनरक्षक अंकुश जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी फोन स्वीकारला नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जबाबदार असलेल्या अधिकार्यांची अशी उदासीनता गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काळवीट हे संरक्षित प्राणी असून अशा घटनांमध्ये तात्काळ पंचनामा, वाहनचालकाचा शोध आणि गुन्हा नोंदवणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात वन विभागाकडून कोणतीही तत्पर कारवाई न झाल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. परिसरात वाढत्या वाहनचळवळीमुळे वन्यजीवांच्या मृत्यूच्या घटना वाढत असून, तरीही वन विभागाचे नियंत्रण नसल्याची ग्रामस्थांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis