सोलापूर, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. रात्रीच्या अंधारात घराघरांत शिरलेल्या पाण्याने अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त केले. घरातील साहित्य भिजले, तर काही वस्तू वाहून गेल्याने नागरिक अक्षरशः हतबल झाले.
अशा कठीण प्रसंगी समाजसेवक संदेश कवितके व काजल कवितके या दाम्पत्याने आपला सामाजिक वसा जपत पुढाकार घेतला. एस.के. सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून दसऱ्याच्या दिवशी सांगोला येथे ५०० हून अधिक पुरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य किट पाठवून आपल्या शेतकरी राज्याला दिलासा दिला आहे.
या उपक्रमासाठी दिनेश मेहरोळ, भावेश कोळी, साकेत पवार, राजेंद्र कोळी, दर्शन कोळी, राहुल पवार, पराग घोसाळकर, नितीन चौधरी, सर्वेश कांबळे, गणेश पाटील, नयनिश बबडे, निखिल चव्हाण, ओमकार गारुड, देवेंद्र कोळी, तुषार चौधरी, अभिजित खानूरकर, सिद्धेश कवितके आदी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी समाजसेवक संदेश कवितके यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आजवर आपण शेतकरी राजाच्या जीवावर जगलो आहोत. परंतु आज तोच शेतकरी राजा संकटात आहे. त्यामुळे त्याला मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाने सढळ हाताने या कार्यात सहभागी व्हावे, हीच खरी सेवा आहे.” असे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर