लातूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
रब्बी हंगामासाठी दुभत्या जनावरांसाठी चारा बियाणे वाटप योजनेकरिता 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन 2025-26 या आर्थिक वर्षात रब्बी हंगामासाठी दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सुधारित संकरित चारा बियाणे 100 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व 10 तालुक्यांमधून पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले असून पशुपालाकांनी परिपूर्ण अर्ज नजीकच्या पशुवैद्यकीय दवखान्यात 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जदाराकडे भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीकृत किमान 3 ते 4 जनावरे असणे आवश्यक असून चारा उत्पादनासाठी स्वतःची शेतजमीन आणि सिंचन सुविधा असावी. सर्व प्रवर्गातील पशुपालकांना या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध आहेत. पूर्णपणे भरलेले अर्ज 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावेत. लाभार्थी निवड पात्र अर्जांमधून सोडत पद्धतीने होईल. 16 ऑक्टोबर 2025 नंतर प्राप्त किंवा अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही.
लातूर जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील पशुपालकांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis