अमरावती, 6 ऑक्टोबर (हिं.स.)
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. दोन महिन्यांत प्रक्रिया केली नाही, तर योजनेचा लाभ बंद होणार आह; पण केवायसीमध्ये तांत्रिक अडथळे येत असल्याचा अनुभव आहे. सर्व्हर ठप्प होत असल्याची व ओटीपी मिळत नसल्याची समस्या महिलांना भेडसावत आहे.
लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना वगळण्यासाठी शासनाने अनेक चाळण्या लावल्या आहेत. त्यानुसार आता प्रत्येक लाभार्थी महिलेने केवायसी करायची आहे. त्यासाठी लाभार्थ्यांसोबत पती किंवा वडिलांचीही ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याद्वारे महिला लाभार्थ्यासोबत तिचा पती किंवा वडिलांचेही वार्षिक उत्पन्न शोधले जाणार आहे.
लाभार्थी महिला विवाहित असेल तर पतीचे आणि अविवाहित असेल तर वडिलांचे उत्पन्न शोधले जाणार आहे. लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास तिला लाभासाठी अपात्र ठरवले जाणार आहे. योजनेची सुरुवात झाल्यापासून नियमितपणे महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळत आहेत. सरकारवर आर्थिक बोजा वाढल्याने विविध नियम लावून लाभार्थ्यांच्या संख्या कमी करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.
मुदतवाढ मिळणार?
ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांत केवायसी करता येणार आहे. मात्र केवायसी करण्यात अडचणी येत असल्याने मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.केवायसीवेळी ओटीपी मिळत नसल्याच्या समस्येची दखल महिला व बालविकास विभागाने घेतली आहे. तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतिपथावर आहे, असा खुलासा या विभागाने केला आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात पोर्टल सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
...अशी आहे योजनेची केवायसी प्रक्रिया
https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. पोर्टलवर नाव, पत्ता, शिधापत्रिका क्रमांक, आधार क्रमांक, उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल. 'कॅप्चा' नोंदविल्यानंतर सहमती दर्शवावी लागेल. त्यानंतर ओटीपी येतो. मात्र, सर्वर काम करीत नसल्याने ओटीपी येणे बंद झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी