रायगड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
चौल-आग्राव रस्ता आता गावकऱ्यांसाठी जीवघेणा आणि धोकादायक ठरला आहे. राज्य सरकारच्या ग्रामसडक योजनेअंतर्गत कामासाठी मंजुरी मिळून दहा महिने उलटले तरी कामाची सुरुवात नाही. परिणामी चौल आणि आग्राव परिसरातील नागरिकांचा संयम सुटला असून सत्ताधाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पावसाळ्यापासूनच हा रस्ता खड्डे, चिखल आणि पाणथळीत बदलला असून दुचाकी असो वा चारचाकी वाहन प्रवास करणे जीव धोक्यात टाकणारे झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “सरकारने आमचं आयुष्य नरकासमान केलंय; रस्ता नाही, तर खड्ड्यांचा महामार्ग तयार झाला आहे.”
चौल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अजित गुरव यांनी सांगितले, “चौल-आग्राव रस्त्याचे काम ६ डिसेंबर २०२४ रोजी मंजूर झाले. कार्यारंभ आदेशही देण्यात आला, पण सहा महिन्यांनंतरही काम सुरू नाही. आम्ही वारंवार निवेदने दिली, पत्रव्यवहार केला, आंदोलने केली, तरीही अधिकारी आणि सत्ताधारी निष्क्रिय राहिले आहेत. ”ग्रामस्थांनी सोशल मीडियावर “खड्ड्यांचे फोटो” आणि “सत्ताधाऱ्यांचे बॅनर” ट्रेंड केले असून, रोष राजकीय गोटांपर्यंत पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी व्यंगात्मक ‘आभार प्रदर्शन’ आयोजित केले. बॅनरवर लिहिले होते. राज्य सरकार आणि ग्रामसडक योजनेतील अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! चौल-आग्राव रस्ता नसल्यामुळे आता आम्ही पायी चालण्याचे आरोग्य जपतो आहोत!”
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, अधिकारी व स्थानिक नेते निवडणुकीपूर्वीच रस दाखवतात; प्रत्यक्षात मातीचा एक ढिगारा हलवला नाही. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत चौल-आग्राव रस्ता हा प्रमुख विषय ठरणार आहे. ग्रामस्थांच्या दैनंदिन समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष हे संतापाचे मूळ आहे. एकंदरीत, चौल-आग्राव रस्ता आता केवळ वाहतुकीचा नव्हे, तर सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेचा जिवंत पुरावा ठरला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके