छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स) शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, अवैध धंद्यांना आळा घालावा, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरीव मदत मिळावी यासह इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने भोकरदन (जि. जालना) भव्य शेतकरी मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे , आमदार रोहित पवार, राजेश टोपे खा. निलेश लंके , खा. कल्याणराव काळे , आमदार चंद्रकांत दानवे आ. संजय वाकचौरे , युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख, ओबीसी सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय काळबांडे, पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, जालना जिल्हाध्यक्ष निस्सार देशमुख, यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.
राज्यातील शेतकरी संपूर्ण कोलमडला असतानाही गेंड्याच्या कातडीचं हे सरकार ढिम्म आहे. शेतकऱ्याला मदत दिली जात नाही. सत्तेत मश्गुल असलेल्या या सरकारला जागं करण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत रस्त्यावरची ही लढाई सुरु ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis