सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हयात अतिवृष्टीमुळे व त्यामुळे सिना नदीला आलेल्या पुराने महावितरण सोलापूर मंडळ अंतर्गत जेऊर, माढा, करमाळा, मोहोळ, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात नदीकाठावर असलेल्या गावात व शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या लघुदाब उच्चदाब व रोहित्र पाण्याखाली गेल्याने संपूर्ण वीज पुरवठा दि.२२.०९.२०२५ पासून पुर्णतः खंडीत होता. बाधित एकूण ९५ गावांपैकी ८८ गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.
या गांवाना वीज पुरवठा करणाऱ्या ११ केव्ही वाहिन्या यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने बऱ्याच ठिकाणी पर्यायी उपकेंद्र व वाहिनी यांच्या साहाय्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. तरी देखील माढा तालुक्यातील वाकाव,कुंभेज,खैराव व सुलतानपुर तसेच मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी व मुंढेवाडी ही गावे दि.०२.१०.२०२५ पर्यंत अंधारात होती.
माढा तालुक्यातील वाकाव कुंभेज,खैराव या गावांना मानेगाव उपकेंद्रातून नवीन २२ पोलची ११ केव्ही वाहिनी उभारून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्याचप्रमाणे दारफळ सिना या गावाला बीज पुरवठा करण्याकरीता १२ तासात नवीन रोहित्राची उभारणी करून वीज पुरवठा सुरू करण्यात आला. सुलतान पुर या गावास बीज पुरवठा करणारी जुनी ११ केव्ही वाहिनी नदीच्या पुरात पुर्णपणे वाहून गेल्याने व नवीन वाहिनी आहे त्या ठिकाणी उभी करण्यासारखी परिस्थिती नसल्याने निमगाव उपकेंद्रातून ४२ पोल ची नवीन ११ केव्ही वाहिनी उभारून वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला.
मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी व मुंढेवाडी या गावांना वीज पुरवठा करणारी ११ केव्ही वाहिनी नदीच्या पाण्यात असल्याने नवीन १२ पोलची ११ केव्ही वाहिनी व मुंढेवाडी रेल्वे स्टेशन जवळ २०० मीटर ११ केव्ही क्षमतेची भुमीगत केबल टाकून युध्द पातळीवर काम पुर्ण करण्यात आले. तसेच पासलेवाडी गावास देखील नवीन १२ पोलची ११ केव्ही वाहिनी टाकून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
वरीलप्रमाणे काम करत असताना नदीतील गाळ,अर्धवट रस्ते,वाहतूकीस अडथळा व पाऊस इत्यादी अडचणी असताना देखील महावितरणचे कर्मचारी यांनी रात्रंदिवस काम पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत केला. या कामी महावितरणचे सोलापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. सुनील माने हे स्वतः जातीने लक्ष ठेवून होते. क्षेत्रीय स्तरावर माढा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री उध्दव जाधव,शाखाधिकारी श्री. शिवम कांबळे व श्री राहूल गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. मोहोळ उपविभागात उपकार्यकारी अभियंता श्री पटवेगर व त्यांचे शाखाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेऊन वीज पुरवठा सुरळीत केला. महावितरण कडून प्रथम गावठाण भाग व पाणीपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात आले. शेतीपंप वाहिनींचे काम मोठया प्रमाणात हाती घेण्यात आले असून लवकरात लवकर तोही वीजपुरवठा चालू करण्यास सुरवात होईल,असे महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड