राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या 65 व्या तुकडीचे शिक्षक गण - सदस्य यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या 65 व्या तुकडीचे शिक्षक गण आणि सदस्य यांनी आज, दिनांक 07 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की र
President Draupadi Murmu


नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या 65 व्या तुकडीचे शिक्षक गण आणि सदस्य यांनी आज, दिनांक 07 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की राष्ट्रहिताच्या बाबी आणि उद्दिष्टे यांच्यामुळे कोणत्याही देशाच्या संरक्षण आराखड्याचा पाया तयार होतो. मात्र, आपल्या राष्ट्रीय हिताच्या केंद्रस्थानी सार्वत्रिक मूल्ये आहेत. भारतीय परंपरेने नेहमीच संपूर्ण मानवतेकडे एक कुटुंब म्हणून पाहिले आहे. सार्वत्रिक बंधुभाव आणि शांतता या आमच्या श्रद्धेच्या बाबी आहेत. पण आम्ही मानवता आणि आपल्या देशासाठी अपायकारक ठरणाऱ्या शक्तींचा पराभव करण्यासाठी सदैव युद्धासाठी सज्ज राहण्याला देखील तितकेच महत्त्व दिले आहे. आपल्या सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान सामूहिकता आणि रणनीतीविषयक दूरदृष्टीच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले आहे. हा सुनियोजित त्रिसेवा प्रतिसाद परिणामकारक समन्वयात रुपांतरीत झाला. नियंत्रण रेषेपलीकडील तसेच सीमापार भागात त्याहीपेक्षा अधिक अंतर्गत भागात असलेले दहशतवादी तळ उध्वस्त करण्यासाठी राबवलेल्या यशस्वी मोहिमेमागे हाच समन्वय होता. लष्करी व्यवहार विभागाची निर्मिती करून संरक्षणदल प्रमुखांना या दलाच्या सचिवपदी नेमण्यासह संयुक्ततेला प्रोत्साहन देण्याची प्रक्रिया सुरु झाली अशी माहिती राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली.एकात्मिक थिएटर कमांड्स आणि एकात्मिक बॅटल ग्रुप्स यांच्या स्थापनेच्या माध्यमातून दलांची पुनर्रचना करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे त्या म्हणाल्या.

बदलते भूराजकीय वातावरण आणि संरक्षणविषयक संदर्भ यामुळे अधिक वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद आवश्यक असतो असे राष्ट्रपती म्हणाल्या. भारत आपल्या सशस्त्र दलांना बहुक्षेत्रीय एकात्मिक कारवायांसाठी सक्षम असलेल्या एका तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत, युद्धासाठी सज्ज दलामध्ये रुपांतरीत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणून घेऊन राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.भारतातील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाने या आंतरराष्ट्रीय कार्यक्रम राबवल्याबद्दल राष्ट्रपतींनी प्रशंसोद्गार काढले. हा कार्यक्रम आता अध्ययनविषयक हस्तक्षेपामध्ये महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.सदर कार्यक्रम अधिक उत्तम ज्ञानग्रहण, परस्पर सहकार्य तसेच सुरक्षेशी संबंधित राष्ट्रीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमधील योग्य दुवे यांची जोपासना करण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande