नांदेड, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन 8 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एकाच वेळी राज्यातल्या ५६० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये विश्वकर्मा कारागिरांच्या उपस्थितीत अत्याधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमांची सुरुवात होणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे दिली.
कामगार हा समाजाचा अविभाज्य घटक असून या घटकाचा सन्मान झाला पाहिजे हा विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला असून याच अनुषंगाने कामगारांचा सन्मान करण्यात येत असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या महत्वकांक्षी उपक्रमाचे उदघाटन होत असतानाच राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये विश्वकर्मांच्या हस्ते अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येत असल्याचेही मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड संस्थेत विश्वकर्मा मारोती पांचाळ यांच्या हस्ते 8 अल्पमुदत अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार रविंद्र चव्हाण, विधान परीषद सदस्य तथा मा. बाळासाहेब ठाकरे हरीद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके, आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात विश्वकर्मा अर्थात कामगार वर्गाचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. सुदृढ आणि सौहार्दपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी कामगारांना सन्मानाचे स्थान मिळायला हवे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विचार आम्ही या निमित्ताने पुढे घेऊन जात असल्याचेही मंत्री लोढा यांनी नमूद केले आहे. याच संकल्पनेतून प्रस्तूत संस्थेमध्ये आयोजित या कार्यक्रमात कामगारांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून चालू वर्षात ७५ हजार प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, पुढील वर्षापासून ही संख्या १ लाख प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा संकल्प कौशल्य विभागाने केला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील उद्योग व्यवस्थापन समित्या (IMC) स्थानिक पातळीवर हे अभ्यासक्रम चालविणार आहेत. त्यामुळे शिक्षणाचे नियोजन, अंमलबजावणी आणि गुणवत्ता नियंत्रण या सर्व बाबींमध्ये स्थानिक सहभाग व उत्तरदायित्व वाढणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित अभ्यासक्रमांचा समावेश असून त्यात अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन, सोलर ऊर्जा, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन हायड्रोजन, मोबाईल दुरुस्ती तंत्रज्ञ, सोशल मीडिया प्रभावक (इन्फ्लुएंसर) इत्यादी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. महिला उमेदवारांसाठी ३६४ विशेष बॅचेस तसेच उदयोन्मुख क्षेत्रांसाठी ४०८ विशेष बॅचेस सुरू करण्यात येणार आहेत. गडचिरोली, लातूर, नागपूर आणि अमरावती येथे स्थानिक उद्योग गरजांनुसार विशेष प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार असून नाशिक येथे होणारा कुंभमेळा लक्षात घेऊन “वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट” हा विशेष अभ्यासक्रमही राबविण्यात येईल, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे नांदेड येथील श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis