भारतीय महिला कबड्डी संघ सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता
ढाका, 24 नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय महिला संघाने सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारताने चिनी तैपेईचा ३५-२८ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारी छत्तीसगडची रेडर संजू देवी हिला स्पर्धेतील सर
भारतीय महिला संघ कबड्डी सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता


ढाका, 24 नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय महिला संघाने सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारताने चिनी तैपेईचा ३५-२८ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारी छत्तीसगडची रेडर संजू देवी हिला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

ढाका येथे झालेल्या अंतिम सामन्यात संघाने सुरुवातीपासूनच पूर्णपणे वर्चस्व गाजवले. २०१२ मध्ये इराणला हरवून भारताने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला होता. महत्त्वाचे म्हणजे, २०१२ आणि २०२५ या दोन्ही वर्ल्ड कप हंगामात संघाने आपले सर्व १२ सामने जिंकले आहेत.

ढाका येथील शाहिद सुहरावर्दी इनडोअर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात, चिनी तैपेईने नाणेफेक जिंकली आणि भारताने पहिली रेड मारली. संजू देवीने आपल्या सलामीला रेड मारून संघाला आघाडी मिळवून दिली. तैपेईने बोनससह प्रत्युत्तर दिले, परंतु पूनम आणि सोनालीच्या टॅकलने भारताची पकड मजबूत केली.

संजूने सुरुवातीच्या काही मिनिटांत आणखी एक शक्तिशाली तीन-गुणांची रेड मारली. तैपेईच्या येन चियाओ-वेनने दोन गुण मिळवून संघाची बरोबरी ७-७ अशी केली. नंतर एका सुपर टॅकलने तैपेईला ९-७ अशी आघाडी मिळवून दिली. १२ व्या मिनिटाला संजूने चार खेळाडूंना बाद केले, ज्यामुळे सामन्याचा रंग बदलला आणि भारत १३-१२ अशी आघाडीवर आला. तैपेईच्या ह्वांग सु-चिनने अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. पण संजूच्या दोन गुणांच्या रेड आणि त्यानंतरच्या ऑलआउटमुळे भारताला १७-१४ अशी आघाडी मिळाली. मध्यंतराला भारत २०-१६ ने आघाडीवर होता.

तैपेईने दुसऱ्या हाफची सुरुवात बोनस पॉइंटने केली. पण पुष्पाच्या तीन गुणांच्या रेडने भारताची आघाडी वाढवली. तैपेईने रेड आणि टॅकलसह पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे स्कोअर २५-२२ झाला, परंतु भारताच्या संतुलित रेडिंग आणि मजबूत बचावामुळे त्यांना आघाडी घेता आली नाही.

शेवटच्या चार मिनिटांत, तैपेईने सुपर टॅकलचा वापर करून आघाडी ३०-२६ अशी कमी केली, परंतु भारताने पुन्हा सामन्यावर आपली पकड घट्ट केली आणि आणखी एक ऑलआउट करण्यास भाग पाडले. निर्धारित वेळेनंतर भारत ३५-२८ असा विजयी झाला.भारतीय संघाने गट फेरीपासून अंतिम फेरीपर्यंतचे सर्व सामने जिंकले. १८ नोव्हेंबर रोजी भारताने थायलंडचा ६५-२० असा पराभव करून स्पर्धेची सुरुवात दमदार केली. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी बांगलादेशवर ४३-१८, २० नोव्हेंबर रोजी जर्मनीवर ६३-२२ आणि २१ नोव्हेंबर रोजी युगांडावर ५१-१६ असा विजय मिळवला.

भारताने उपांत्य फेरीत इराणचा ३३-२१ असा पराभव केला आणि अंतिम फेरीत चिनी तैपेईवर ३५-२८ असा विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा विश्वचषक विजेतेपद पटकावले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande