
नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘उभरते विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषद’ (ईएसटीआयसी 2025) चे उद्घाटन केले. या प्रसंगी पंतप्रधानांनी १ लाख कोटी रुपयांच्या संशोधन, विकास आणि नवोन्मेष (आरडीआय) योजना निधीचा शुभारंभ केला. या योजनेचा उद्देश देशातील खाजगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील संशोधन आणि विकास परिसंस्थेला प्रोत्साहन देणे हा आहे.
ईएसटीआयसी हा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सरकारचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम मानला जात आहे, जो दरवर्षी आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनानुसार, या तीन दिवसीय परिषदेत शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, उद्योग क्षेत्र आणि सरकारकडून ३,००० हून अधिक सहभागी हजर राहणार आहेत. याशिवाय नोबेल पारितोषिक विजेते, प्रख्यात शास्त्रज्ञ, नवोन्मेषक आणि धोरणनिर्माते देखील सहभागी होत आहेत.
‘कल्पना करा’, ‘नवोन्मेष करा’,’प्रेरणा द्य' या थीमअंतर्गत ही परिषद धोरणनिर्माते, अग्रगण्य शास्त्रज्ञ, उद्योग नेते, शिक्षक, स्टार्टअप्स आणि संशोधक यांना एकाच व्यासपीठावर आणते.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, ईएसटीआयसी हे असे व्यासपीठ आहे जे कमतरता ओळखणे, भागीदारी निर्माण करणे आणि विज्ञान व तंत्रज्ञानाला भारताच्या विकासाच्या प्राधान्यांशी जोडणे या दिशेने काम करेल.
परिषदेत शास्त्रज्ञांची व्याख्याने, पॅनेल चर्चा, सादरीकरणे आणि तंत्रज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आली आहेत, ज्यामुळे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्थेला बळ मिळेल आणि संशोधक, उद्योग क्षेत्र आणि युवा नवोन्मेषकांमधील सहयोग वाढवला जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode