
जळगाव, 9 नोव्हेंबर (हिं.स.)शासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईच्या अनुदानात मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात बनावट शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान लाटल्याचा आरोप असून महसूल प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.
राजुरा येथील एका शेतकऱ्याने तक्रार करून सांगितले की, बोरखेडा गावात अस्तित्वात नसलेल्या शेतजमिनी दाखवून काहींनी अतिवृष्टी नुकसानभरपाईचा लाभ घेतला. ही तक्रार आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाखल झाल्यानंतर त्यांनी महसूल प्रशासनास कारवाईच्या सूचना दिल्या.तहसीलदार गिरीश वखारे यांच्या आदेशानुसार मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, उचंदा येथील कोतवाल राहुल रवींद्र सोनवणे यास आज अटक करण्यात आली आहे. सोनवणे याच्यावर बनावट कागदपत्रांद्वारे नागरिकांच्या नावावर अनुदान लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पुढील एक आरोपींवर गुन्हा दाखल तर दोन निलंबनच्या फेऱ्यात अडकले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर