
सोलापूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)
दीड लाख द्या अन् टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण व्हा, अशा चर्चा शिक्षकांमध्ये झडत आहेत, माध्यमांवर व्हायरल होत आहेत. मात्र, त्या चर्चा पूर्णपणे तथ्यहिन आहेत. परीक्षेशी संबंधित सर्व डेटा डिजिटल सुरक्षा यंत्रणेत साठवला जात आहे. सेंट्रल कंट्रोल रूममधून झूम मीटद्वारे प्रत्येक परिक्षार्थीवर वॉच ठेवला जाणार आहे. त्यामुळे टीईटीमध्ये गैरप्रकार होऊच शकणार नसल्याचा दावा शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केला.टीईटी विषयी माध्यमांवर गैरवृत्त व्हायरल होत आहे. राज्यात टीईटी परिषदेकडून काटेकोर, पारदर्शक आणि सुरक्षितरित्या परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी परीक्षार्थींचे फेस रिकग्निशन, बायोमेट्रिक पडताळणी, फ्रिस्किंगद्वारे (शारीरिक तपासणी) संपूर्ण सुरक्षात्मक प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याचेही शिक्षणाधिकारी शेख यांनी कळविले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड