
अमरावती, 11 डिसेंबर (हिं.स.)। तालुक्यातील तळेगाव ठाकूर ते विचूरी शेत शिवारातील पांदन रस्त्यावर विद्युत खांबवरील तुटून पडलेल्या जिवंत विजताराचा स्पर्श झाल्याने तीन म्हशी जागीच दगावल्याची घटना घडली. या घटनेत शेतकरी महेश मलमे (रा. गुरुदेव नगर) यांचे अडीचलाख रुपयाचे नुकसान झाले असून ते देखील थोडक्यात बचावले. वीज वितरण विभाग व लाईनमन कर्मचाऱ्यांच्या हलकर्जीपणामुळे सातत्यानेशेतकऱ्यांचे नुकसान होत असून आज या विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.नादुरुस्त डीपी, विद्युत खांब अशा विविध समस्येने शेतकऱ्याचे आधीच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना तळेगाव ठाकूर विचुरी या शेतशिवारात शेतकरी महेश मलमे हे नियमित आपल्या म्हशी चराईसाठी घेऊन जातं असताना पांदण रस्त्या लगत पडून असलेल्या जिवंत विजतारांचा जबरदस्त धक्का लागल्याने त्यांच्या तीन म्हशी जागीच दगावल्याची घटना सामोरं आली आहे. सुदैवाने मलमे हे थोडक्यात बचावले मात्र त्यांच्या संपूर्ण घराचा उदरनिर्वाह हा म्हशीवर अवलंबून असल्यामुळे त्यांनी वीज वितरण विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.या घटनेची माहिती मिळताच तिवसा वीजवितरण विभागातील अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले होते. यावेळी युवक काँग्रेसचे जसबीर ठाकूर, मोझरीचे उपसरपंच प्रशांत प्रधान, अतुल लोमटे, प्रवीण मलमे, अंकुश बायस्कर, सुनील पिटकर, दिनेश मिराशे, आदी शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी