
रत्नागिरी, 18 डिसेंबर, (हिं. स.) : भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीने रत्नागिरी तालुक्यात विविध कामांसाठी ४ कोटीचा विकास निधी उपलब्ध झाला आहे.
भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण यांच्याकडे निधीची मागणी केली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विकास निधी आवश्यक आहे, असे सांगितले होते, याची तत्काळ दखल श्री. चव्हाण यांनी घेतली आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी पत्रव्यवहार केला.
त्यानुसार रत्नागिरी तालुक्यातील विविध ४२ कामांना निधी उपलब्ध करून दिला. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांनी याकामी मोलाची कामगिरी केली. चार कोटीचा ग्रामीण भागात विकास निधी उपलब्ध झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री जयकुमार गोरे, अनिकेत पटवर्धन यांचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी