
सोलापूर, 28 डिसेंबर (हिं.स.)।
सध्या भाजपमध्ये निष्ठावंत विरुध्द आयाराम यांच्यात शीतयुध्द सुरू झाल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या राजकीय पटलावर उमटत आहे. एकीकडे आ. देवेंद्र कोठे यांनी भाजप स्वबळावर लढावी, यासाठी आग्रही असल्याचे वृत्त असतानाच आ. विजयकुमार देशमुख आणि आ. सुभाष देशमुख यांच्या समर्थक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारीत डावलण्यात येत असल्याचे लक्षात आल्याने बंडाची भाषा केली आहे. त्यामुळे भाजपात खळबळ उडाली आहे.
भाजपतील अनेक निष्ठावंतांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिंदेसेनेत जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भाजप-शिंदे सेना यांच्यातील महायुती धोक्यात येण्याची शक्यता असून, शिंदेसेनेने स्वबळाची तयारी केली आहे. आ. देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या गटातील 15 जणांना उमेदवारी देण्याची मागणी भाजपकडे केल्याने भाजपमधील अंतर्गत वाद पेटला आहे. दोन्ही देशमुखांनी निष्ठावंत कार्यकर्ते अन्य पक्षात जाऊन उभे राहिल्यास त्यांना बळ देऊ, अशी भूमिका जाहीर केल्याने भाजपमधील नाराजांचा फायदा शिंदेसेना उचलण्याच्या तयारीत आहे. सोलापुरातील महायुतीसंदर्भात दोन बैठका झाल्या असून, अजून निर्णय अंतिम झालेला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड