पश्चिम महाराष्ट्रात साखर उतार्‍यात कोल्हापूर आघाडीवर
सोलापूर, 28 डिसेंबर (हिं.स.)। ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटून गेला असून, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक उतारा कोल्हापूर विभागाचा आहे. निव्वळ साखर उतारा ही 9.65 इतके असून, तुलनेने सर्वाधिक साखर कारखाना असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मात्र सरासरी
sugar mill


सोलापूर, 28 डिसेंबर (हिं.स.)।

ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटून गेला असून, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक उतारा कोल्हापूर विभागाचा आहे. निव्वळ साखर उतारा ही 9.65 इतके असून, तुलनेने सर्वाधिक साखर कारखाना असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मात्र सरासरी उताराही 9 टक्क्याच्या खाली आहे.

राज्यात 91 सहकारी आणि 93 खासगी मिळून 184 साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. यामध्ये 80 लाख मेट्रिक टनाइतके सर्वाधिक ऊस गाळप पूर्ण करून पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. 77.98 लाख मेट्रिक टन गाळपासह कोल्हापूर विभाग ऊस गाळपात दुसर्‍यास्थानी आहे. विशेष म्हणजे 9.65 टक्क्यांइतका सर्वाधिक निव्वळ साखर उतारा कोल्हापूरचा असून, या विभागाने सर्वाधिक 74.88 लाख क्विंटलइतके साखरेचे उत्पादन केले आहे.

राज्यात सद्यस्थितीत 336 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे. तर 8.27 टक्के निव्वळ साखर उतार्‍यानुसार राज्यात 27 लाख 83 हजार मेट्रिक टन नवे साखर उत्पादन तयार झालेले असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली. गतवर्षी याचदिवशी 117 लाख 33 हजार मेट्रिक टन ऊस गाळप आणि 7.89 टक्के निव्वळ उतार्‍यानुसार राज्यात 13.99 लाख मेट्रिक टनाइतके साखर उत्पादन तयार झाले होते. याचा विचार करता चालूवर्षी दुप्पट ऊस गाळप व साखर उत्पादन हाती आले आहे. पुणे विभागात 29 कारखाने सुरू असून, त्यांची दैनिक गाळप क्षमता 2 लाख 6 हजार 950 मेट्रिक टन आहे. तुलनेने कोल्हापूर विभागातील 35 कारखान्यांकडून दैनिक 2 लाख 33 हजार 850 मे. टनाइतके ऊस गाळप सुरू आहे. त्यामुळे ऊस गाळपात कोल्हापूर विभाग थोडा मागे असला तरी लवकरच पुणे विभागास मागे टाकण्याची दाट शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande