- जाहीर मदत तुटपुंजी, शेतकरी संतापला
मुंबई, 27 सप्टेंबर (हिं.स.) - राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे पिचला आहे. पुरामुळे शेतात उभे असलेले पीक वाहून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा उभे राहण्यासाठी शेतकरी वर्गाला मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. मात्र, राज्य सरकारकडून दिली जात असलेली मदत तुटपुंजी असल्याचे सांगत महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे, त्यांना मदत करण्याची गरज आहे. मराठवाड्यातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार-पाच दिवसात तर अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकऱ्याचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. दरम्यान झाडून सर्व मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी डोळ्यांनी हे नुकसान पाहिले. पण मदत करताना निकषाचा डोंगर उभा ठाकला आहे. तुटपूंज्या मदतीविरोधात शेतकरी संतापला आहे. पूरग्रस्तांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी. मात्र, राज्यात सध्या निवडणुका नाहीत, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत नाहीत का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते.
मराठवाड्यात शेतात पाणी होतं. शेतकरी धाय मोकलून रडत होते. शेतकरी आपुलकीने माझ्याशी बोलले. सरकारने आता जी मदत देऊ केली आहे. ती अगदीच तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. खूप मोठं नुकसान झालं आहे. दोन-तीन वर्ष त्यांना या संकटातून बाहेर पडायला लागेल. विद्यार्थ्यांची वह्या पुस्तकं वाहून गेली आहे, हे मोठं नुकसान आहे. त्यामुळे सरकारने आता निकष न लावता सरसकट मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. आतापर्यंत जाहीर झालेली 14 हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. 2017 मध्ये जी कर्जमाफीची घोषणा झाली, त्याची अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. पंजाब राज्य सरकारने जशी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर केली. तशी मदत महाराष्ट्र सरकारने जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 75 लाख महिलांच्या खात्यात 10-10 हजार रुपये टाकले आहेत. बिहारला मदत करत आहेत म्हणून पोटदुखी होत नाही. पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाल भरभरुन मतदान केले, आज त्याच महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे, त्यांना मदत केली पाहिजे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. महाराष्ट्रातील शेत जमीन पुन्हा पीक घेण्यायोग्य बनवण्यासाठी तीन ते पाच वर्ष लागणार आहेत. आता जाहीर केलेली मदत जेमतेम हेक्टरी सात ते आठ हजार रुपये आहे. आता जमीन साफ करायचाच एकरी खर्च 5 लाख आहे. शेत जमिनीला पीक योग्य बनवण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागणार” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
2017 च्या कर्जमाफीची अजून प्रतीक्षा आहे. माझं महाविकास आघाडीचे सरकार आले, तेव्हा मी कालबद्ध पद्धतीने कर्जमाफी केली. संकट आल्यावर पंचांग काढून बसलो नाही. मला यात राजकारण आणायचं नाही. पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मागणी करणे मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल तर त्यांनी तसं समजावं. शेतकऱ्याला सरसकट कर्जमुक्त करा. पंजाबमध्ये हेक्टरी 50 हजार रुपये कालबद्ध मदत तिथल्या सरकारने शेतकऱ्याला जाहीर केली. याला म्हणतात सरकार. पंतप्रधानांनी पंजाबला 1600 कोटी आणि हिमाचलला 1500 कोटीची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातही हेक्टरी शेतकऱ्याला 50 हजार रुपये मदत द्या. महाराष्ट्रात डबल इंजिनच सरकार आहे. मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले, परिस्थितीवर चर्चा केली. समोर दिसतय तर चर्चा कसली करता. दयावान पंतप्रधानांनी प्रस्ताव पाठवायला सांगितला. समोर दिसतंय तर प्रस्ताव कसला पाठवायचा?, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी