
ढाका, 04 जानेवारी (हिं.स.)बीसीसीआयने केकेआरला स्पष्ट केले की, त्यांना बांगलादेशचा क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमानला रिलीज करावे लागेल आणि आयपीएलमधून वगळावे लागणार आहे. तेव्हा आयपीएलमध्ये मोठा बदल झाला. केकेआरनेही त्याचे अनुकरण केले. पण बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आता प्रत्युत्तर दिले आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि भारतात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकाबाबत एक निवेदन जारी केले. आसिफ नजरुल यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले की, बांगलादेश आता भारतात विश्वचषक खेळण्याच्या बाजूने नाही आणि हे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात आहेत.
या संपूर्ण वादाच्या मुळाशी बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान आहे. क्रीडामंत्र्यांचा आरोप आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अतिरेकी आणि सांप्रदायिक गटांच्या दबावाखाली कोलकाता नाईट रायडर्सला मुस्तफिजूर रहमानला त्यांच्या संघातून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्र्यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला आणि तो खेळाच्या भावनेविरुद्ध असल्याचे म्हटले आहे.
आसिफ नजरुल यांनी सांगितले की, त्यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला पत्र लिहून परिस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. बांगलादेश सरकारचा असा युक्तिवाद आहे की, जर एखादा करारबद्ध क्रिकेटपटू भारतात असुरक्षित असेल आणि दबावाखाली त्याला काढून टाकता आले तर संपूर्ण बांगलादेशी संघ विश्वचषकादरम्यान तेथे सुरक्षित वाटणार नाही. या सुरक्षेच्या चिंतांचा उल्लेख करून बांगलादेशने त्यांचे विश्वचषक सामने भारताऐवजी श्रीलंकेत आयोजित करण्याची मागणी केली आहे.
मंत्र्यांनी भारताविरुद्ध आपला विरोध व्यक्त करण्यासाठी बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशीही संपर्क साधला आहे. बांगलादेशात सध्या सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांचे प्रसारण त्वरित थांबवावे अशी मागणी त्यांनी केली आहे. सोशल मीडियावर ते म्हणाले, आम्ही बांगलादेश क्रिकेट, आमच्या क्रिकेटपटूंचा किंवा आमच्या देशाचा कोणत्याही किंमतीत अपमान सहन करणार नाही. गुलामगिरी आणि दडपशाहीचे दिवस संपले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे