
रायगड, 28 फेब्रुवारी (हिं.स.) : कुरूळ ते सहाण बायपास मार्गावरील रस्ते कामामुळे परिस्थिती आधीच बिकट असताना, बंदी असूनही जड आणि अवजड वाहनांची सर्रास वर्दळ सुरू राहिल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अतिक्रमण, अरुंद रस्ता आणि ठिकठिकाणी सुरू असलेले खोदकाम यामुळे अपघाताचा धोका टोकाला पोहोचला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या मार्गावर जडवाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले होते. मात्र शनिवारी सकाळी नागरिकांनी बंदी असलेल्या वाहनांची उघडपणे वाहतूक करत असल्याचे पाहिले.
यामुळे सहाण ते बेलकडे दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. कामावर जाणारे कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांनाही रस्त्यावर अडकावे लागले. नागरिकांनी आरोप केला की, वाहतूक नियंत्रणासाठी यंत्रणा तैनात असूनही जडवाहनांकडे दुर्लक्ष केले गेले. “आदेश आहेत तरी अंमलबजावणी कुठे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
काही वाहनचालकांनी रात्रीच्या वेळीही जडवाहनांची वाहतूक सुरू असल्याचा आरोप केला आहे. रस्त्याच्या कामामुळे प्रवास आधीच धोकादायक असताना, प्रशासनाच्या आदेशाचे पालन न केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उठली आहे. संभाव्य मोठा अपघात होण्यापूर्वीच संबंधित यंत्रणा जागी येईल की, दुर्घटना घडल्यानंतरच कारवाई होईल, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके