
मुंबई, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। वांद्रे पूर्व येथील भारतनगर परिसराचा विकास करण्याबाबत शासनाची कार्यवाही सुरू आहे. या अनुषंगाने लवकरात लवकर सर्वेक्षण पूर्ण करण्याबाबत आदेश देण्यात येतील. तसेच सर्वेक्षणानंतर म्हाडा अथवा झोपटपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यापैकी कोणत्या यंत्रणेमार्फत विकास करायचा याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
विधानसभा सदस्य वरुण सरदेसाई यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य मुरजी पटेल यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.
याबाबत अधिक माहिती देताना मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, भारतनगर येथील मूळ जागा म्हाडाच्या ताब्यात असून येथील क्षेत्र ४० एकर पेक्षा अधिक आहे. या ठिकाणी म्हाडामार्फत रहिवाशांना वितरीत केलेल्या जागेबरोबरच काही अतिक्रमणधारक तसेच काही झोपडीधारक आहेत. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करुन विगतवारी होणे गरजेचे आहे. या सर्वांचे सर्वेक्षण केल्यानंतर त्या परिसराच्या विकासाबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर