
मुंबई, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। : मुंबईसह राज्यभरातील भटक्या श्वानांच्या संदर्भात विविध उपाययोजना राबविल्या जात असून शाळा व मैदानांभोवती संरक्षण भिंती (कंपाउंड) पूर्ण करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर परिसरात कचरा साठू नये, यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाला निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषद सदस्य डॉ.मनीषा कायंदे, प्रवीण दरेकर, ज.मो.अभ्यंकर यांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या शाळा परिसरातील भटक्या श्वानांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले असता राज्यमंत्री मिसाळ यांनी माहिती दिली.
राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, भटक्या श्वानांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणीत काही निर्देश दिले होते. त्यानुसार श्वानांचे स्थलांतर केंद्रांमध्ये करणे तसेच स्वायत्त संस्थांच्या अखत्यारितील शैक्षणिक संस्था, मैदाने, रुग्णालये आदी ठिकाणी नोडल अधिकारी नेमण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. संबंधित संस्थांच्या दर्शनी भागावर नोडल अधिकाऱ्याचे नाव लावण्याचेही निर्देश होते.
महानगरपालिकेकडून शाळा-महाविद्यालयांना भटक्या श्वानांबाबत कोणतेही काम सोपविण्याचा लेखी अथवा तोंडी आदेश देण्यात आलेला नाही. तथापि, शाळांमधील शिक्षकांना फक्त श्वानदंश झाल्यास विद्यार्थ्यांनी कोणती प्राथमिक खबरदारी घ्यावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या जनजागृती संदर्भातील सूचनेनुसार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
भटक्या श्वानांचा प्रश्न हा केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे सर्वसमावेशक आणि कायदेशीर मार्गानेच या समस्येवर उपाययोजना केल्या जातील, असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर