
सोलापूर, 28 फेब्रुवारी (हिं.स.)।
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या महितीनुसार शक्तिपीठ महामार्गात बदल होणार हे निश्चित झाले आहे. सोलापूर जिल्ह्यापासून या मार्गात बदल होणार आहे.
नागपूर ते गोवा हा बहुचर्चित शक्तिपीठ महामार्ग हा सुरवातीलापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा महामार्ग पूर्वीच्या नागपूर रत्नागिरी महामार्गाला अगदी समांतर महामार्ग होत असल्याने या महामार्गाच्या आराखड्यात बदल करण्याचे निश्चित झाले आहे. यापूर्वी नियोजित मार्गाच्या गावांची यादी व्हायरल झालेली होती. तरीदेखील पूर्वीच्या मार्गाने शक्तिपीठ महामार्ग निश्चित केला जाईल असे सांगण्यात येत होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या महामार्गातील आराखड्यातील बदलावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या महितीनुसार पूर्वीचा मार्ग हा नागपूर-कोल्हापूर या मार्गाला समांतर होणार असल्याने आता नवीन मार्ग सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यापासून वळविण्यात आला आहे. पूर्वीचे उत्तर सोलापूर व सांगोला हे तालुके वगळून माढा व माळशिरस हे नवीन तालुके यामध्ये घेतले आहेत. तर मोहोळ व पंढरपूर या तालुक्यातील गावांमध्ये बदल झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड