
रायगड, 01 मार्च (हिं.स.)। “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर येथील ओवे मैदानावर भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी भेट देत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
या समागमात विविध धार्मिक विधी, कीर्तन आणि गुरूंच्या बलिदानाची गाथा सांगणारे कार्यक्रम पार पडले. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमात “हिंद-दी-चादर” उपक्रमाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री राणे यांनी आपल्या भेटीदरम्यान गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शौर्य आणि त्यागाची आठवण करून दिली. समाजात एकता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश त्यांच्या जीवनातून मिळतो, असे त्यांनी नमूद केले. अशा कार्यक्रमांमुळे तरुण पिढीला इतिहासाची आणि बलिदानाची जाणीव होते, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि शीख समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या समागमामुळे परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके