सेवेचा संस्कार, स्वच्छतेचा संकल्प; रेवदंड्यात ३७.५ टन कचरा हटवला
रायगड, 01 मार्च (हिं.स.)। पहाटेचा मंद वारा, हातात झाडू–फावडे आणि मनात समाजसेवेचा दृढ निश्चय… असे चित्र रविवारी रेवदंडा परिसरात पाहायला मिळाले. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या भव्य स्वच्छता अभियानात २,४७६
Service culture, cleanliness resolution; 37.5 tons of garbage removed in Revdanda


रायगड, 01 मार्च (हिं.स.)। पहाटेचा मंद वारा, हातात झाडू–फावडे आणि मनात समाजसेवेचा दृढ निश्चय… असे चित्र रविवारी रेवदंडा परिसरात पाहायला मिळाले. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या भव्य स्वच्छता अभियानात २,४७६ स्वयंसेवकांनी स्वखर्चाने, स्वप्रेरणेने सहभाग घेत परिसराला नवसंजीवनी दिली. दिवसभराच्या अथक परिश्रमांतून तब्बल ३७.५ टन ओला व सुका कचरा संकलित करण्यात आला.

३२.३० किलोमीटर लांबीचे रस्ते, १६,७८७.०६ चौरस मीटर क्षेत्रफळाची शासकीय कार्यालये व रुग्णालये आणि तब्बल ५ किलोमीटर समुद्रकिनारा स्वच्छ करताना स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता; होती ती केवळ समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी “माझा परिसर, माझी जबाबदारी” हा मंत्र जपत हातभार लावला.

प्रतिष्ठानकडून वृक्षलागवड, रक्तदान, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, अंध व मूकबधिर विद्यार्थ्यांना मदत अशा अनेक उपक्रमांतून सातत्याने समाजकार्य केले जाते. या कार्याची दखल घेत नरेंद्र मोदी यांनी जेष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब उर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांची ‘स्वच्छतादूत’ म्हणून निवड केली होती—हीच प्रेरणा प्रत्येक स्वयंसेवकाच्या पावलांत जाणवत होती.

कचऱ्याचे ढिगारे हटवत असताना अनेकांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू दाटले. “स्वच्छता हीच सेवा” या भावनेतून उभा राहिलेला हा उपक्रम केवळ मोहीम नव्हती, तर समाजाला दिलेला स्वच्छतेचा संस्कार होता. रेवदंड्यात घुमलेला हा सेवाभाव परिसरापुरता मर्यादित न राहता प्रत्येकाच्या मनात कायमचा घर करून गेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande