
सोलापूर, 01 मार्च (हिं.स.)। उजनी धरण क्षेत्रात यंदा मोठ्याप्रमाणात पाऊस पडल्याने जुलै महिन्यांतच धरण शंभर टक्के भरले होते. गेल्या दीड महिन्यांत भीमा नदीसह, सीना बोगदा, कालव्यातून पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने तब्बल 32 टक्के पाणी पातळी कमी झाली आहे. धरणात 68.87 टक्के म्हणजे 36.89 टीएमसी पाणीसाठा आहे. मृत साठा धरून एकूण पाणीसाठा 100 टीएमसी आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता कमी आहे.
उजनी धरणातून भीमा नदीत 4400 क्युसेक आणि वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक असा एकूण 6 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हे पाणी हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यानंतर विसर्ग बंद केला जाणार आहे. धरणातून शेतीसाठी उजनी मुख्य कालवा, भीमा सीना जोड कालवा, दहिगाव व सीना माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात येत आहे. 26 जानेवारीपासून आतापर्यंत धरणातील पाणी पातळी 32 टक्के कमी झाली आहे.
धरणातून रब्बी हंगामासाठी सुरुवातीला उजनी मुख्य कालवा, जोड कालवा व दहिगाव योजनेतून पाणी सोडण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड