
जळगाव, 02 मार्च (हिं.स.) अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या तणावाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या संघर्षाचे पडसाद आता जागतिक बाजारपेठेत उमटू लागले असून त्याचा अप्रत्यक्ष फटका जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. निर्यात ठप्प झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी देश-विदेशात ओळखला जातो. येथील केळीला विशेषतः आखाती देशांमध्ये मोठी मागणी असते. सध्या रमजान महिना सुरू असल्याने केळीची मागणी वाढलेली असतानाच युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातून दररोज सुमारे १० ते १२ कंटेनर केळी आखाती देशांकडे पाठवली जात होती. मात्र, सध्या निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणामुळे ही निर्यात पूर्णपणे थांबली आहे. विशेषतः इराणसह इतर मुस्लिम देशांकडे होणारी निर्यात अडकल्याने व्यापारी आणि शेतकरी दोघेही अडचणीत सापडले आहेत.निर्यात बंद झाल्याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे. युद्धापूर्वी केळीला प्रतिक्विंटल सुमारे २५०० रुपये दर मिळत होता. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तो घसरून सुमारे १५०० रुपयांवर आला आहे. दरातील या मोठ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
एकीकडे उत्पादन खर्च वाढलेला असताना दुसरीकडे निर्यात बंद आणि दर घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर