
नवी दिल्ली , 02 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियात वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. इराणकडून संयुक्त अरब अमिरात (यूएई)वर वाढत्या हल्ल्यांमुळे प्रादेशिक सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी सध्याच्या परिस्थितीची माहिती घेत भारताची एकजूट आणि पाठिंबा व्यक्त केला. याबाबतची माहिती स्वतः पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टद्वारे दिली.
पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, या चर्चेत प्रादेशिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली आणि भारताच्या चिंता त्यांनी मांडल्या. नागरिकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच संघर्ष तातडीने थांबवण्याची गरज अधोरेखित केली. सर्व पक्षांनी शक्य तितक्या लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी आवाहन केले.
यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांच्याशी झालेल्या संवादात पंतप्रधान मोदी यांनी यूएईवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि या हल्ल्यांत मृत्यू झालेल्यांबद्दल गहिरे दुःख व्यक्त केले. या कठीण काळात भारत यूएईसोबत ठामपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल त्यांनी राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले. यूएईमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक वास्तव्यास आणि नोकरीस आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत भारत सरकार सतत संपर्कात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात भारत हा प्रदेशातील शांतता, सुरक्षा आणि स्थैर्याचा समर्थक असल्याचे सांगितले. तणाव कमी करण्यावर (डी-एस्कलेशन) त्यांनी भर दिला आणि सर्व पक्षांनी एकत्रितपणे शांतता राखण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. दरम्यान, यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांबाबत अबू धाबी येथील भारतीय दूतावासाने माहिती दिली की, हल्ल्यात जखमी झालेला भारतीय नागरिक रुग्णालयात उपचारानंतर सुरक्षित आहे. दूतावास प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असून जखमी भारतीयाला सर्वतोपरी मदत दिली जात असल्याचेही सांगितले.
यूएईच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून ५८ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विविध देशांचे नागरिक असून त्यात भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. हल्ल्यांदरम्यान अनेक ठिकाणी स्फोट आणि मलबा पडल्याने मालमत्तेचे नुकसान झाले.
यूएई सैन्याच्या माहितीनुसार, इराणकडून मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यात आले. आतापर्यंत १६५ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, दोन क्रूझ क्षेपणास्त्रे आणि ५४१ ड्रोन डागण्यात आले. यापैकी ५०६ ड्रोन हवेतच पाडण्यात आले, तर ३५ ड्रोन देशाच्या हद्दीत कोसळल्याने मर्यादित नुकसान झाले. हवाई हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सातत्याने कार्यरत असल्याचेही सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode