
परभणी, 02 मार्च (हिं.स.)।
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला मिळणार असल्याचा गैरसमज मुद्दाम पसरविण्यात आल्याचा आरोप जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केला आहे. जिल्ह्यात विकास होऊ नये अशी भूमिका घेणाऱ्या काही घटकांकडून हे कारस्थान रचले गेल्याचे त्या म्हणाल्या.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने जमिनीच्या मोजणी प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सर्व प्रक्रिया राबवली जाईल. कोणताही प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला जाणार नाही आणि त्यांचे कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री यांनी दिल्यानंतरच मोजणी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत सर्व निर्णय पारदर्शक पद्धतीने घेतले जातील, असेही पालकमंत्र्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis