
सोलापूर, 02 मार्च (हिं.स.)। राज्यातील सर्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन ठामपणे पाठीशी उभे आहे. ‘उमेद’च्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू असून राज्यातील सर्व महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा निर्धार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
नॉर्थ कोर्ट मैदान येथे ग्रामविकास व पंचायत राज विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर (उमेद) आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रुक्मिणी महोत्सव व मिनी सरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन’ कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने मिनी सरस जिल्हा रुक्मिणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांची आर्थिक बळकटी आणि सक्षमीकरण साधण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाने जगावे, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी ‘उमेद’च्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड