मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीचा खून - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- सातारा जिप राड्याचे विधिमंडळात पडसाद मुंबई, 23 मार्च (हिं.स.) - राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनातून बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळावर संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्
एकनाथ शिंदे विधानसभा


- सातारा जिप राड्याचे विधिमंडळात पडसाद

मुंबई, 23 मार्च (हिं.स.) - राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनातून बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळावर संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत म्हटले की, “मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे.” या घटनेला त्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे प्रकरण ठरविले. सदरची बाब त्यांनी आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली.

विधानसभेत बोलताना शिंदे यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वीच शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी त्यांना फोन करून दोन मतदारांवर अचानक गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती. या प्रकारामागे निवडणुकीचा निकाल बदलण्याचा प्रयत्न असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर शिंदे यांनी तत्काळ साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्याशी संपर्क साधून स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, मतदान पूर्ण होईपर्यंत कोणत्याही मतदाराला अडवू नये. मात्र प्रत्यक्षात दोन मतदारांना ताब्यात घेण्यात आल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

या घटनेचा निषेध करताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारे मतदारांना मतदानापासून रोखण्याची घटना प्रथमच घडली असून हा प्रकार लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर आघात करणारा आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे सहन केले जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande