हिंदूंना आपली निर्णायक लढाई स्वत:च लढावी लागेल ! - रमेश शिंदे
* मुंबईत प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार ! मुंबई, 23 मार्च (हिं.स.) - आताच्या आधुनिक गणराज्यात कायदा सर्वांना समान सांगितला जातो. सध्याचे गणतंत्र देशभक्तांच्या अस्तित्वाच्या स
रमेश शिंदे


* मुंबईत प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

मुंबई, 23 मार्च (हिं.स.) - आताच्या आधुनिक गणराज्यात कायदा सर्वांना समान सांगितला जातो. सध्याचे गणतंत्र देशभक्तांच्या अस्तित्वाच्या संरक्षणासाठी देशातील धर्मांध जिहाद्यांचा नाश करीत नाही उलट त्यांना संविधानिक अधिकार देतो, असे खेदाने म्हणावे लागत आहे. भारतात संविधान, गणतंत्र जर आहे तर काश्मीरमध्ये सर्व साडे सात लाख विस्थापित हिंदूंची घरवापसी झाली असती ! न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले तर न्यायालय म्हणते इतकी जूनी गोष्ट आज का घेऊन येता ? तेच न्यायालय गांधी हत्या, शीख दंगे अशा केसेस आज देखील ऐकते ? त्यामुळे हिंदूंना आपली निर्णायक लढाई स्वत:च लढावी लागेल. जातपात, पद, पक्ष, संघटना, प्रांत यांचे भेद विसरून आपल्याला संघटित व्हायला लागेल, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री.रमेश शिंदे यांनी केले. ते मुंबईतील मुलुंड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या एक दिवसीय प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात बोलत होते. या अधिवेशनामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये डॉक्टर, प्राध्यापक, विचारवंत, अधिवक्ता, उद्योजक, मंदिरांचे विश्वस्त, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख, गोरक्षक यांचा सहभाग होता.

या अधिवेशनाचा आरंभ ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामाचा सामूहिक जप, शंखनाद, वेदमंत्रपठण आणि संत, मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती’ या सनातन संस्थेच्या ग्रंथाचे ‘ॲमेझॉन’वरील ‘ई-बुक’ चे प्रकाशन करण्यात आले. या अधिवेशनात विविध सत्रांत अनेक मान्यवर वक्त्यांनी प्रबोधन केले. हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर म्हणाले, 'स्वत:चे रक्षण करण्याचा अधिकार राज्यघटनेने प्रत्येकाला दिला आहे. धर्मरक्षणाच्या निर्णायक लढ्यात सनदशीर मार्गाने आपणाला धर्माच्या बाजूने लढायचे आहे'. प्रख्यात सर्जन आणि लेखक डॉ. अमित थडानी म्हणाले, 'मागील ५० वर्षांत साम्यवाद्यांनी शिक्षण, चित्रपटसृष्टी या माध्यमातून साम्यवादाचा प्रपोगंडा निर्माण केला आणि केवळ स्वत:ची विचारधारा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. हिंदूंनी आपले विचार सर्वांपर्यंत पोचवत आपल्या संस्कृतीची ओळख विश्वाला करून देण्यासाठी आपण हिंदु धर्माचे ‘‘ब्रँड अम्बेसिडर’ व्हायला हवे'.

पाकिस्तानात प्रतिवर्षी अनुमाने 1 हजार मुलींचे बळजबरीने धर्मांतर आणि निकाह लावला जातो. तेथील पोलीस यंत्रणा, न्याययंत्रणा, राजकीय पुढारी या गोष्टींना संरक्षण आणि बळ देण्याचे काम करतात, हे भीषण वास्तव मानवाधिकार कार्यकर्ता आणि लघुचित्रपट निर्माता श्री. महेश वासू यांनी या अधिवेशनात मांडले. प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ यु ट्यूबर श्री. सचिन गायकवाड यांनी ‘लव्ह जिहाद रोखण्यासाठीचे प्रयत्न आणि यश’ याविषयी मार्गदर्शन केले. 'संतांचे मार्गदर्शन घेऊन हिंदूंनी जात-पात, पक्ष-संघटना यांची बंधने बाजूला सारून धर्मकार्यासाठी संघटित व्हायला हवे' असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. मुंबईतील सनबर्न फेस्टविल विरोधात नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या वतीने राबवलेल्या मोहिमेसंदर्भात आलेल्या विविध अनुभवांचे कथन प्रा. श्रीपाद सामंत यांनी यावेळी केले. तर बदलापूर येथील २० वर्षीय मुलीने प्रभु श्रीरामांविषयी अभद्र टिपणी केल्याच्या प्रकरणी शेकडो हिंदू एकत्र आले. या विरोधात दिलेल्या लढ़याविषयी अंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या संयोजिका ज्योती जवळेकर यांनी आपले अनुभव सांगितले. संपूर्ण 'वंदे मातरम'ने या अधिवेशनाची सांगता करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande