
तेहरान , 27 मार्च (हिं.स.)।इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी अमेरिका आणि इस्रायलवर तीव्र टीका केली. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेला (यूएनएचआरसी) पाठवलेल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी मिनाब शहरातील एका शाळेवर ‘पूर्वनियोजित हल्ला’ झाल्याचा आरोप केला. त्यांनी या घटनेला ‘मानवतेविरुद्धचा गुन्हा’ असे संबोधले. अराघची यांनी सांगितले की, शजराह तैय्यबेह प्राथमिक शाळेवर झालेल्या या हल्ल्यात १७५ हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांचा मृत्यू झाला.
अराघची म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायल स्वतःकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याचा दावा करतात, त्यामुळे शाळेवर झालेला हल्ला चुकून झाला असे मानता येणार नाही. त्यांनी याला युद्धगुन्हा तसेच मानवतेविरुद्धचा गंभीर गुन्हा ठरवले. अशा कृत्याचा संपूर्ण जगभर निषेध व्हायला हवा आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले की, या अत्याचाराचे समर्थन करता येणार नाही, तो लपवता येणार नाही आणि त्यावर शांतता किंवा उदासीनता दाखवणेही योग्य नाही. हा हल्ला केवळ ‘घटना’ किंवा ‘चूक’ नव्हती, असा त्यांनी जोर देऊन उल्लेख केला. अमेरिकेकडून दिली जाणारी परस्परविरोधी विधाने ही आपला गुन्हा झाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि अशा विधानांमुळे जबाबदारीपासून सुटका होऊ शकत नाही, असे सांगितले.
अहवालानुसार, मिनाबमधील या शाळेवर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी हल्ला झाला होता, जो युद्धाचा पहिलाच दिवस होता. २७ मार्च रोजी युद्धाला एक महिना पूर्ण होत असताना अराघची यांनी ही प्रतिक्रिया दिली.
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराण-अमेरिका युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेच्या टोमहॉक क्रूझ क्षेपणास्त्राने दक्षिण इराणमधील मिनाब येथील शजराह तैय्यबेह प्राथमिक शाळेला लक्ष्य केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात किमान १७५ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश होता, तर अनेक जण जखमी झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode