
नांदेड, 31 मार्च (हिं.स.) : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे घरातील संवाद कमी होत असून अनेक घरे ‘मुकी’ झाली आहेत. कुटुंबात संवाद वाढवून ‘बोलकी घरे’ निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय धर्म जागरणचे प्रमुख शरद ढोले यांनी केले.
येथील दिगंबर स्वामी शाळेत आयोजित हिंदू संमेलनात ते बोलत होते. यावेळी कोंडलिंगेश्वर देवस्थानचे महंत विरागीदास महाराज, पिंपळगाव दत्त संस्थानचे बालयोगी व्यंकटस्वामी, गोपाळकृष्ण मंदिराचे महंत भोजराज अमृते, विरसणी देवस्थानचे बाळा महाराज तसेच महंत ईश्वरानंद अमृते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात महंत विरागीदास महाराज आणि बालयोगी व्यंकटस्वामी यांनीही मार्गदर्शन करत सामाजिक ऐक्य आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. देवानंद चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर दिनेश तवर यांनी आभार मानले.
या संमेलनाला बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मोहन चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, धर्म जागरणचे प्रांत प्रचारक सिद्धेश्वर बिरादार, शासकीय तांडा समितीचे सदस्य प्रकाश राठोड, माजी सरपंच आनंदराव घंटलवार, जीवन आडे, कोळी महादेव संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव नारेवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष भागवता देवसरकर, डॉ. दीपक नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.संमेलनाची सांगता ‘पसायदान’ने करण्यात आली.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis