
परभणी, 21 एप्रिल (हिं.स.)। शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवडी बाजार अचानक जुन्या जागेवर हलवण्यात आल्याने शेतकरी, व्यापारी व नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप करत नगर परिषद सदस्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. बाजार पुन्हा पूर्ववत मूळ जागेवरच भरवण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
.
निवेदनात म्हटले आहे की, दर गुरुवारी भरणारा हा आठवडी बाजार कोणत्याही नगर परिषद ठरावाशिवाय अचानक जुन्या जागेवर हलवण्यात आला. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून नियोजनाचा अभाव स्पष्ट दिसून येत आहे.
सदस्यांनी पुढे नमूद केले की, जुन्या बाजाराच्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. बसण्यासाठी ओटे नाहीत, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे तसेच सावलीसाठी झाडे किंवा शेडची व्यवस्था नाही. जागा अपुरी असल्याने भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसून व्यवसाय करावा लागत आहे. उन्हामुळे शेतीमालाचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
दरम्यान, शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मैदान येथे लाखो रुपये खर्च करून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या असताना बाजार हलवण्याचे कारण काय, असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला आहे.
आगामी २३ एप्रिल २०२६ पासून आठवडी बाजार पुन्हा मूळ जागेवर भरवण्यात यावा, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis