“मर्यादा ओलांडू नका, भारत विसरत नाही”, पाकिस्तानला इशारा
- भारतीय लष्कराकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण - पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीला केली ट्विटर पोस्ट नवी दिल्ली, 21 एप्रिल (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग केले होत
भारतीय सैन्याने केलेली पोस्ट


- भारतीय लष्कराकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण

- पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीला केली ट्विटर पोस्ट

नवी दिल्ली, 21 एप्रिल (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलींग केले होते. या भ्याड हल्ल्याची बुधवारी वर्षपूर्ती असून त्याच्या पूर्वसंध्येला भारतीय लष्कराने ट्विटरव (एक्स) पोस्ट करत “मर्यादा ओलांडू नका, भारत विसरत नाही” असे सांगत ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण करवून दिली आहे.

यासंदर्भातील पोस्टमध्ये भारतीय सेनेने नमूद केले की, “जेव्हा मानवतेच्या मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा उत्तरही ठाम आणि निर्णायक असते. न्याय मिळाला आहे. भारत एकजूट आहे.” यासोबतच एका ग्राफिकमध्ये “काही मर्यादा कधीही ओलांडल्या जाऊ नयेत. भारत विसरत नाही,” असा संदेश देण्यात आला. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली होती. भारतीय सेनेने पाकिस्तान तसेच पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले चढवले. या कारवाईदरम्यान 9 प्रमुख दहशतवादी लॉन्चपॅड उद्ध्वस्त करण्यात आले आणि लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद व हिज्बुल मुजाहिदीन यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले. या लष्करी कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये 4 दिवस तणावपूर्ण संघर्ष सुरू राहिला. मोठे नुकसान सहन केल्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधत युद्धविरामाची विनंती केली. पाकिस्तानच्या विनवणीनंतर अखेर 10 मे रोजी दोन्ही बाजूंमध्ये युद्धविरामावर सहमती झाली.

सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक करत ते स्पष्ट राजकीय निर्देशांखाली तिन्ही सैन्यदलांमधील उत्कृष्ट समन्वयाचे उदाहरण असल्याचे म्हटले होते. तसेच, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन सुदर्शन चक्र’ची घोषणा केली होती. या मोहिमेचा उद्देश शत्रूच्या घुसखोरीला आळा घालणे आणि भारताच्या आक्रमक क्षमतांमध्ये वाढ करणे हा आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande