कोल्हापूर - १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना 'स्वयंगणना' करण्याची सुविधा
कोल्हापूर, 22 एप्रिल (हिं.स.)। देशाच्या २०२७ च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ही २१ व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिलीच डिजिटल जनगणना ठरणार आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील कामकाजाची सविस्तर माहिती देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जि
कोल्हापूर - १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना 'स्वयंगणना' करण्याची सुविधा


कोल्हापूर, 22 एप्रिल (हिं.स.)। देशाच्या २०२७ च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ही २१ व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिलीच डिजिटल जनगणना ठरणार आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील कामकाजाची सविस्तर माहिती देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील, नायब तहसीलदार नितीन धापसे आणि जनगणना संचलनालयाचे जिल्हा समन्वयक तुषार पाटील उपस्थित होते.

जनगणना ही धोरणात्मक व संख्यात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, या जनगणनेतील माहितीचा उपयोग देशातील विकास योजनांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करताना अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे गजानन गुरव यांनी यावेळी सांगितले.

*नागरिकांसाठी १ ते १५ मे २०२६ कालावधीत स्वयंगणनेची विशेष सुविधा*

जिल्ह्यामध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असून, १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणकांद्वारे प्रत्यक्ष घरयादी व घरगणना केली जाणार आहे. तत्पूर्वी, नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठी १ मे ते १५ मे २०२६ या पंधरा दिवसांच्या कालावधीत स्वयंगणनेची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी https://se.census.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर भेट देऊन आपली माहिती भरावयाची आहे. या पोर्टलवर १४ विविध भाषांमध्ये माहिती भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती यशस्वीरीत्या भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळखपत्र क्रमांक (आयडी) प्राप्त होईल, जो नागरिकांनी अत्यंत सुरक्षितपणे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. १६ मे नंतर जेव्हा प्रगणक घरभेटीसाठी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी दिल्यास प्रगणक तो पोर्टलवर अपलोड करतील आणि नागरिकांची माहिती अधिकृतरीत्या जनगणनेत नोंदवली जाईल.

*कोल्हापूर जिल्ह्याची प्रशासकीय व संख्यात्मक आकडेवारी*

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या व्यापक राष्ट्रीय कार्यक्रमासाठी सूक्ष्म प्रशासकीय नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण १३ तहसिल कार्यालये, १३ नगरपालिका किंवा नगरपरिषदा आणि १२५७ महसूल गावांचा समावेश आहे. या संपूर्ण क्षेत्रातील जनगणनेसाठी ४९९९ हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स निश्चित करण्यात आले आहेत. तसेच, तळागाळात जाऊन अचूक माहिती संकलित करण्यासाठी जिल्ह्यात एकूण ६०५४ प्रगणक आणि ९९५ पर्यवेक्षक यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरावर व क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक आणि प्रत्यक्ष कामकाजाचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे.

*अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान आणि माहितीची सुरक्षितता*

यंदाची जनगणना कागदविरहित आणि पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असल्याने, माहिती संकलनासाठी विशेष ॲप्लिकेशन्सचा वापर केला जाणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष कुटुंबाची तसेच घराची सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी 'हाऊजलिस्ट ॲप' (HLO) वापरले जाणार आहे. या अद्ययावत प्रक्रियेद्वारे घराची स्थिती, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, आणि मालमत्ता याबद्दलची सखोल माहिती घेतली जाईल. या वेब पोर्टलमध्ये भरलेली जिल्ह्यातील नागरिकांची सर्व वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहणार आहे.

*नागरिकांना परिपूर्ण आणि अचूक माहिती देण्याचे आवाहन*

जनगणना ही केवळ एक आकडेवारी नसून ती देशाच्या आणि राज्याच्या भविष्यातील प्रगतीचा आणि लोककल्याणकारी योजनांचा भक्कम पाया आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सुजाण नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या उपलब्ध वेळेनुसार १ मे ते १५ मे दरम्यान घरबसल्या स्वयंगणना पोर्टलचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच, प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करून आपल्या कुटुंबाची प्रामाणिक, अचूक आणि परिपूर्ण माहिती द्यावी व जनगणनेच्या या राष्ट्रीय कर्तव्यात आपले बहुमूल्य योगदान द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande