मौजे नागेवाडी (जि. सातारा) येथे आयटी पार्क उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
* सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचा पुढाकार मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.) - सातारा जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी मौजे नागेवाडी (ता. सातारा, जि. सातारा) येथील गट क्रमांक 308/1 मधील सुमारे 42.55 हेक्टर आ
मौजे नागेवाडी (जि. सातारा) येथे आयटी पार्क उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी


* सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचा पुढाकार

मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.) - सातारा जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी मौजे नागेवाडी (ता. सातारा, जि. सातारा) येथील गट क्रमांक 308/1 मधील सुमारे 42.55 हेक्टर आर (आरक्षित) शासकीय जमिनीवर अत्याधुनिक आयटी पार्क उभारण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी पुढाकार घेतला होता.

या संदर्भात मंत्रालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेऊन या बाबतीत आग्रही भुमिका मांडली होती. या आयटी पार्कमुळे सातारा जिल्हा तसेच परिसरातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. तसेच, पुणे-मुंबईसारख्या महानगरांवरील आयटी क्षेत्रातील ताण कमी करण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत आयटी कंपन्यांसाठी आवश्यक असलेली सर्व आधुनिक पायाभूत सुविधा — प्रशस्त रस्ते, वीज, पाणीपुरवठा, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, तसेच कार्यालयीन इमारतींची उभारणी करण्यात येणार आहे. यासोबतच स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

याबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले म्हणाले, “सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करणे आवश्यक आहे. नागेवाडी येथील आयटी पार्क प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीला गती मिळेल. राज्य शासन उद्योगविकासाला प्राधान्य देत असून, अशा प्रकल्पांद्वारे ग्रामीण भागातही आधुनिक विकास घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्याची ओळख एक उदयोन्मुख आयटी हब म्हणून निर्माण होण्याची शक्यता असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा चालना मिळणार आहे. तसेच, उद्योग, सेवा क्षेत्र आणि पायाभूत सुविधा विकासालाही या प्रकल्पामुळे बळकटी मिळणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, प्रकल्पाची अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande