
नंदुरबार, 22 एप्रिल, (हिं.स.) भारत सरकारच्या जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरनोंदणी व गृहगणना प्रक्रियेसाठी
नंदुरबार जिल्हा प्रशासनाने सर्वंकष व नियोजनबद्ध तयारी पूर्ण केली असून, प्रशिक्षण, मनुष्यबळ नियोजन
सर्व स्तरांवर वेगाने काम सुरू असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी आशा
संघवी यांनी कळविले आहे.
भारतीय जनगणना ही जगातील सर्वात मोठी प्रशासकीय प्रक्रिया मानली जाते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात
जनगणना 2027 चा पहिला टप्पा 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत मोबाईल ॲपच्या माध्यमातून
स्वयंगणना स्वरूपात राबविण्यात येणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यात 16 मे ते 14 जून 2026 या
कालावधीत प्रत्यक्ष घरगणना (House Listing and Housing Census) केली जाणार आहे. या
कालावधीत प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करणार आहेत, असेही
संघवी यांनी कळविले आहे.
या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सक्षम करण्यासाठी विविध स्तरांवर प्रशिक्षण कार्यक्रम
राबविण्यात आले आहेत. दिनांक 1 जानेवारी 2026 तसेच 23 ते 25 मार्च 2026 या कालावधीत तालुका
स्तरावरील प्रभारी अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी तसेच जिल्हा जनगणना अधिकारी यांना
प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय, यशदा, पुणे मार्फत 14 ते 17 मार्च 2026 दरम्यान जिल्ह्यासाठी
नियुक्त दोन मास्टर ट्रेनर्सना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 6 ते 11 एप्रिल
2026 दरम्यान जिल्ह्यातील 58 फिल्ड ट्रेनर्सना जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण देण्यात आले
आहे.
पुढील टप्प्यात 23 एप्रिल ते 8 मे 2026 या कालावधीत तालुका स्तरावर नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक यांना
प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रगणकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गाव, पाडे, वाडे-
वस्ती तसेच शहरी भागातील प्रभाग व वार्डमध्ये जाऊन प्रत्यक्ष घरगणना करण्याची जबाबदारी
सोपविण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात जनगणना कार्यासाठी व्यापक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली असून, ग्रामीण व
शहरी भाग मिळून एकूण 58 फिल्ड ट्रेनर्स, 3 हजार 91 प्रगणक (राखीवसह) आणि 517 पर्यवेक्षक
(राखीवसह) कार्यरत राहणार आहेत. या मनुष्यबळाच्या सहाय्याने जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वस्ती व
शहरी भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जनगणना प्रक्रियेला व्यापक जनसहभाग मिळावा यासाठी जनगणना संचालनालयामार्फत तयार करण्यात
आलेल्या डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. गुगल ड्राईव्हद्वारे उपलब्ध करून दिलेल्या
ध्वनीफिती, व्हिडिओ, मराठी गीते, घोषवाक्ये, बॅनर व फलक यांचा वापर करून विविध माध्यमांतून
प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येत आहे.
जनगणना ही राष्ट्रीय विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, शासनाच्या विविध योजना व
धोरणांच्या आखणीसाठी यातील माहितीचा आधार घेतला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने
सहभागी होऊन अचूक व सत्य माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे. तसेच, मोबाईल ॲपद्वारे
स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांनी त्याचा अधिकाधिक वापर करावा, असेही
आवाहन करण्यात आले आहे. जनगणना 2027 यशस्वी करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन कटिबद्ध
असून, पारदर्शक, अचूक व सर्वसमावेशक जनगणना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचेही निवासी
उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी आशा संघवी यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर