
मुंबई, 22 एप्रिल, (हिं.स.)। २०२३ मध्ये महिला आरक्षणाचे विधेयक आले, तेव्हा काँग्रेसने याला समर्थन दिले होते आणि एकमताने ते मंजूर झाले होते.तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी काँग्रेसला श्रेय दिले होते का? आता जे विधेयक आणले होते त्यात नारी शक्तीचा उल्लेख कुठे होता? महिला आरक्षणाची सिरियल किलर भाजपच असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत केली.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ५८ वेळा काँग्रेसचे नाव घेतले, पण महिलांच्या हितावर भाष्य केले नाही. वरळीतील 'महिला आक्रोश' आंदोलनाचा संदर्भ देत वडेट्टीवार म्हणाले की, खऱ्या महिला आक्रोशाची ताकद काय असते, हे काल एका सामान्य भगिनीने सरकारला आरसा दाखवून सिद्ध केले आहे. २०–३०महिला गोळा करून केलेले आंदोलन म्हणजे जनतेचा आवाज नव्हे,ज्या पद्धतीने ती महिला शूरवीराप्रमाणे तुटून पडली, त्यावरून स्पष्ट होते की जनतेला भाजपचे जुमालेबाजीचे राजकारण समजले आहे असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी हे एक सच्चे माणूस असून, त्यांनी महिला आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.पण निवडणुका आल्या की उत्तर ते दक्षिण भारतात कोण सरड्यासारखे रंग बदलतो, हे देशाला चांगलेच ठाऊक आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
अजित पवार यांच्या मृत्यू बाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रश्न उपस्थित केले,त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले की, सुनेत्रा ताईंनी ही भूमिका घेण्यास उशीर केला आहे. हा अजित दादांचा घातपात आहे का, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात होता. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर हे वक्तव्य आधी आले असते तर आगडोंब उसळला असता पण आता हे प्रकरण निवळले आहे.
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारी बाबत काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेल असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर