
नवी दिल्ली, 05 एप्रिल (हिं.स.)उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित‘ध्यान नेत्यांचे जागतिक संमेलन, समग्र जीवनशैली आणि शांततापूर्ण जगासाठी ध्यान’या परिषदेला संबोधित केले. ही परिषद पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीज मूव्हमेंट आणि बुद्ध-सीईओ क्वांटम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
उपराष्ट्रपतींनी आयोजक, वक्ते, ध्यानगुरू आणि सहभागी यांचे अभिनंदन करत ध्यानाच्या माध्यमातून समग्र जीवनशैली आणि जागतिक शांततेचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. तामिळ संत तिरुमूलर यांच्या शिकवणींचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की ध्यान म्हणजे अंतर्मनातील दीप प्रज्वलित करण्यासारखे आहे, जो अज्ञान दूर करून सत्य आणि शांततेकडे मार्गदर्शन करतो. तिरुमूलर यांनी मानवी शरीराला मंदिर मानले असून ध्यान हे अंतर्गत दैवीत्व जाणण्याचे साधन असल्याचे त्यांनी नमूद केले.
आजच्या जगात अनेक आव्हाने असल्याचे नमूद करत उपराष्ट्रपती म्हणाले की संघर्ष केवळ बाह्य स्वरूपातच नाही तर तो प्रत्येक व्यक्तीच्या मनातही अस्तित्वात असतो. अशा परिस्थितीत ध्यान शांतता, स्पष्टता आणि सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच इतरांचे ऐकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढवते. उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले की ध्यानाची खरी शक्ती मानवामध्ये परिवर्तन घडविण्यात आहे. ध्यानामुळे ताणतणाव कमी होतो, एकाग्रता वाढते, भावनिक स्थैर्य सुधारते आणि अति विचार व अति काम करण्यासारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येते.
उपराष्ट्रपतींनी अर्थपूर्ण जीवनाच्या मोबदल्यात भौतिक सुखाचा अविरत पाठलाग करण्याविरुद्ध सावध केले आणि असे निरीक्षण नोंदवले की, संपत्तीने सुखसोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, मात्र त्या जीवनावरच वरचढ ठरू नयेत. ध्यानामुळे विचारशक्ती वाढते आणि व्यक्तीला संतुलित व परिपूर्ण जीवन जगण्यास सक्षम करते, यावर त्यांनी भर दिला. ध्यानाची प्रक्रिया केवळ आध्यात्मिक साधकांसाठीच आहे हा भ्रम देखील त्यांनी दूर केला. हे सर्वांसाठी आहे आणि ते सामान्य व्यक्तींना उच्च चेतनेकडे नेऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
2047 पर्यंत विकसित भारताच्या स्वप्नाचा संदर्भ देत त्यांनी नमूद केले की, आर्थिक वाढीसोबतच मानसिक आरोग्याची जोपासना करणे तितकेच महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, आंतरिक शांतता, भावनिक संतुलन आणि विचारांची स्पष्टता जोपासण्यात ध्यान महत्त्वाची भूमिका बजावते, जे एका प्रगत राष्ट्रासाठी आवश्यक आहे.
अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध लढण्याच्या आपल्या दीर्घकालीन वचनबद्धतेवर प्रकाश टाकत, उपराष्ट्रपतींनी अंमली पदार्थ निर्मूलनाच्या उद्देशाने 2004 मध्ये काढलेल्या आपल्या पदयात्रेची आठवण करून दिली. विशेषतः तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या वाढत्या सेवनाबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, तणाव, चिंता आणि दिशाहिनतेवर मात करण्यास मदत करून ध्यान हे व्यसनाधीनतेवर उपचार करण्यासाठी एक शक्तिशाली साधन ठरू शकते.
तत्त्वज्ञ जिद्दू कृष्णमूर्ती यांचे उद्धरण देत उपराष्ट्रपती म्हणाले, मूल्यमापन न करता निरीक्षण करण्याची क्षमता हा बुद्धिमत्तेचा सर्वोच्च प्रकार आहे. त्यांनी नमूद केले की, ध्यानामुळे व्यक्तीला विचार न करता आपल्या विचारांचे निरीक्षण करणे शक्य होते, ज्यामुळे वैयक्तिक परिवर्तन घडते. असे परिवर्तन सूज्ञ व्यक्ती, सुसंवादी समुदाय, दयाळू नेतृत्व आणि अधिक मानवी संस्थांना प्रोत्साहन देते, असेही त्यांनी पुढे सांगितले.
आंतरिक परिवर्तनाच्या गरजेवर भर देताना उपराष्ट्रपती म्हणाले की, एका चांगल्या जगाची निर्मिती ही उत्तम आणि शांत मनाची जोपासना करण्यापासून सुरू होते आणि ध्यान हा त्या प्रवासाचा आरंभ बिंदू आहे.
या प्रसंगी सीबीआय आणि सीआरपीएफचे माजी संचालक डी.आर. कार्तिकेयन, ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन आश्रमाचे अध्यक्ष आणि आध्यात्मिक प्रमुख स्वामी चिदानंद सरस्वती जी, क्वांटम लाइफ युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. न्यूटन कोंडावेती, बुद्ध-सीईओ क्वांटम फाउंडेशनचे संस्थापक चंद्र पुलमशेट्टी, पिरामिड स्पिरिचुअल ट्रस्ट (हैदराबाद) चे अध्यक्ष विजय भास्कर रेड्डी यांच्यासह ध्यान मार्गदर्शक, धोरणकर्ते आणि विद्वान उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे